‘नागपुरात पुन्हा मतदान घ्या’ : अपक्ष उमेदवारांची संयुक्तपणे मागणी | पुढारी

'नागपुरात पुन्हा मतदान घ्या' : अपक्ष उमेदवारांची संयुक्तपणे मागणी

नागपुर; पुढारी वृत्तसेवा : १९ एप्रिल रोजी नागपूर मतदार संघात झालेल्या लोकसभा निवडणुकीत कमी मतदानाने प्रमुख राजकीय पक्षांची चिंता वाढलेली असताना मतदारयादीतील गोंधळ ७ लाख मतदार मतदानापासून वंचित झाल्याने अनेक अपक्ष उमेदवारांनी आज बुधवारी संयुक्तपणे पत्रपरिषदेत संताप व्यक्त केला. नागपुरात पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली. शासन,प्रशासन घोळात निवडणुकीवर सामान्य जनतेचा विश्वास उरलेला नाही हे या निवडणूकीतून स्पष्ट झाले आहे. भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी आचारसंहितेच्या कलम १२६ चे खुलेआम उल्लंघन केले त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करा, पुन्हा निवडणूक घ्या अशी मागणी सामूहिकरित्या लोकसभेच्या रिंगणात असलेल्या या उमेदवारांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून केली. गडकरी यांच्याकडून आचारसंहितेचे खुलेआम उल्लंघन केले गेले याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्याकडेही करण्यात आली.

१९ एप्रिल रोजी नागपुरात लोकसभा निवडणूक होती, त्या दिवशी यातीलच काही उमेदवारांनी बूथची पाहणी केली असता, बूथवर बसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडून मतदारांना एक स्लिप तयार करून वाटली जात होती, त्या स्लिपवर नितीन गडकरींचा फोटो आणि कमळाच्या फुलाचे चित्र होते. एकप्रकारे प्रचार संपल्यावरही मतदारांना डिजिटली प्रचारातून कमळाच्या फुलाचे बटण दाबण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते. नागपूर शहरातील अनेक बूथवर खुलेआम हा प्रकार घडत असल्याचे पाहून त्यांनी तत्काळ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, मात्र यश न आल्याने काही उमेदवारांनी बूथवर चालणारी मशीन सोबत नेली तर काहींनी फोटो काढले, यासोबतच व्हिडिओही काढण्यात आले. संपूर्ण नागपूर शहरात हा प्रकार उघडपणे दिसला, हा व्हिडीओ आणि फोटो अनेक ठिकाणांहून अनेक उमेदवारांनी काढले, तसेच अनेकांची पत्रेही जमा करण्यात आली, ४ मशीन जप्त करण्यात आल्याचा आरोप केला. याबाबत उमेदवारांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्याकडे तक्रार केली मात्र त्यांनी कोणतीही तक्रार दाखल केली नाही. १९५१ च्या आचारसंहितेच्या कलम १२६ चा भाग असलेल्या भारतीय जनता पक्षासह प्रशासन आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी या आचारसंहितेचे उल्लंघन केले. प्रचार संपल्यापासून ते मतदान संपेपर्यंत ४८ तासांच्या कालावधीत, कोणताही पक्ष किंवा उमेदवार कोणत्याही प्रकारचे सिनेमॅटोग्राफ, टेलिव्हिजन किंवा इतर कोणत्याही प्रकारचे लोकांसमोर प्रदर्शित करू शकत नाही. ज्या उपकरणाद्वारे निवडणूक प्रचारादरम्यान आचारसंहिता प्रदर्शित केली जाऊ शकत नाही. या संपूर्ण प्रक्रियेबद्दल नागपूरचे निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक आयोगाला पत्र पाठविल्याची माहिती देण्यात आली. मतदार यादीतील घोळामुळे जनतेला मतदानाच्या त्यांच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित राहावे लागले. नागपूर शहरातील सुमारे ७ लाख लोकांचे नाव मतदार यादीत नसल्याने, तासनतास रांगेत उभे राहून त्यांना निराशेचा सामना करावा लागला. मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले. वेळीच निवडणूक आयोगाने याकडे लक्ष दिले नाही.या हुकूमशाहीमुळे जनतेचा भारतीय राजकारणावरील विश्वास कमी होत असल्याचा आरोप देश जनहित पक्षाचे उमेदवार किविन्सुका सूर्यवंशी, अपक्ष उमेदवार सुशील पाटील, संतोष चौहान, साहिल तुळकर, विक्की बेलखोडे, दीपक मस्के आदी उमेदवारांनी पत्रपरिषदेत केला. निवडणूक आयोगाचा हा अन्याय सहन करणार नाही अशी प्रतिज्ञा देखील कार्यकर्त्यांनी नागपुरात घेतली आणि या गंभीर विषयात लवकर कारवाई न झाल्यास आम्ही कोर्टाच्या पायरीसह तीव्र आंदोलनाची भूमिका घेणार असल्याचे देश जनहित पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद मेश्राम यांनी सांगितले. लोकसभेची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी करण्यात आली.

Back to top button