नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने शरद पवार यांच्या वयाचा दाखला देत टीका करतात, मात्र ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय विचारण्याची हिंमत दाखवतील का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. अमरावती येथे होणाऱ्या प्रदेश काँग्रेस बैठकीसाठी रवाना होण्यासाठी आले असता ते बोलत होते. पटोले म्हणाले, महाविकास आघाडीचे जागावाटप ठरलेलं आहे. पण योग्यवेळी आम्ही सर्व पक्षांच्या जागा घोषित करू. संघटनात्मक काँग्रेस मजबूत आहे. निकालही महाविकास आघाडीच्या बाजूने पाहायला मिळेल.
ऍड प्रकाश आंबेडकर असो की, जागा वाटप फॉर्मुला असो, ही प्रक्रिया सुरू होताना योग्य वेळी पहायला मिळेल. सगळ्यांचा समावेश त्यामध्ये असेल. दरम्यान, मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यासंदर्भात विचारले असता भाजपने घेतलेल्या सर्व्हेमध्ये 40 जागा या महाविकास आघाडीला दाखवत आहे. मोदी हे प्रचारक आहेत, प्रधानमंत्री कमी, त्यामुळे ते प्रचारासाठी सतत महाराष्ट्रात येत असतात. आव्हाड यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत छेडले असता जितेंद्र आव्हाड काय बोलले? हे मला माहिती नाही. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्याचारग्रस्तांना प्रवाहात आणले. त्यांनी संविधानात व्यवस्था निर्माण केली आहे. बाबासाहेबांचे हे उपकार कोणीही नाकारू शकत नाही यावर पटोले यांनी भर दिला. शंकराचार्य बोलले ते बरोबरच आहे. श्री राम मंदिराचं काम अजूनही अर्धवट आहे. मंदिर वही बनाएंगे, म्हणत देशात उद्रेक निर्माण करणाऱ्या भाजपने चार किलोमीटरवर भगवान श्रीरामाचे मंदिर बांधलं. मुळात भाजपला भगवान श्रीरामांना राजकारणात आणायचे होते असे टीकास्त्र नाना पटोले यांनी सोडले.
हेही वाचा