

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस, राष्ट्रवादीने शेतकऱ्यांना अनेकदा ताटावरून उठवलं. तेच आता ताट घेऊन आंदोलन करतात. त्यामुळे त्यांना लाज राहिली नाही. कुणालाही जेव्हा सत्ता असते तेव्हा शेतकरी आठवत नाही. सत्ता गेल्यावर शेतकरी आठवल्याशिवाय राहत नाही. अशी परिस्थिती आता विरोधकांची आहे असे टीकास्त्र आमदार बच्चू कडू यांनी सोडले आहे. विदर्भात सर्वाधिक पट्टा कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांसाठी धोरण आखणे गरजेचे आहे. संत्र्याबाबत अधिवेशनात विचारमंथन व्हायला हवे.
विदर्भातील संत्री चवीसाठी प्रसिद्ध आहे. पण त्याला बाजारपेठ मिळत नाही. आरक्षण आणि शेतकऱ्यांला मदत हे दोन महत्त्वाचे मुद्दे अधिवेशनात मांडणार आहे. शहरातील मतांकडे जास्त लक्ष दिले जाते.
बजेटमध्ये बघितलं तर शहरावर जास्त २० टक्के निधी, ग्रामीण भागावर केवळ ५ टक्के निधी खर्च होतो. घर देताना सरकारला लाज वाटत नाही. घरकुल लाभार्थ्यांना किमान तीन लाख रुपये दिले पाहिजे. मजूर लोकांना ही योजना दिली पाहिजे. मराठा समाजासह सर्व समाजाच्या जातीच्या सर्वेक्षणाची गरज आहे.कोणत्या जातीची किती संख्या आहे? त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे? हे एकदा तपासले पाहिजे असेही कडू म्हणाले.