

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : तीन राज्यातील भाजपच्या महाविजयानंतर महाराष्ट्रात भाजपचा उत्साह ओसंडून वाहत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे भाकित केले आहे. या विधाननंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हेच एकमेव वाघ आहेत. त्यांच्याशिवाय दुसरा कोणताही वाघ राज्यात असूच शकत नाही, असा टोलाही बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
तीन पक्षांच्या महायुती सरकारमध्ये यामुळे अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपली मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा बोलून दाखविली असली तरी स्वतः फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले असताना बावनकुळे वारंवार असे का बोलतात, हा प्रश्न कायम आहे.
भंडारा येथील एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस हे २०२४ मध्ये वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे भाकितही बावनकुळे यांनी केले आहे. यासोबतच आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ४५ खासदार राज्यातून निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला आहे. एकीकडे भाजपचे बडे नेते आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० पार जागा मिळतील असा दावा केला जात असताना बावनकुळे यांनी रविवारी केला.