नागपूर, पुढारी वृत्तसेवा : ओबीसीची संख्या ५२ टक्के आहे. मात्र ५० टक्क्यांवर आरक्षण देता येत नाही, म्हणून ओबीसीला फक्त २७ टक्के आरक्षण मिळाले आहे. आम्ही कोणाचे हिसकावले नाही किंवा अतिक्रमण केलेले नाही, अशी रोखठोक भूमिका ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली आहे.
एकंदरीत ओबीसी महासंघाने मराठा नेत्यांना ठणकावले असल्याने येणाऱ्या दिवसांत पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनात मराठा-ओबीसी आरक्षण प्रश्नी संघर्ष अटळ असल्याची चिन्हे दिसू लागली आहे.
तायवाडे म्हणाले, आज राज्यभर फिरत असताना मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटलांची भाषा वेगळ्या पद्धतीची आहे. ७० वर्षांपासून त्यांचे आरक्षण कोणीही हिसकावलेले नाही. हा देश संविधानाप्रमाणे चालतो. आजवर आरक्षणासंदर्भात अनेक आयोगाने काम केलेले आहे. त्या संदर्भातील यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे कोणी जर म्हणत असेल की, तुम्ही लुटले ते म्हणणे योग्य नाही. आम्हाला आरक्षण मिळाले आहे, ते संविधानानुसार मिळाले आहे. मराठा समाजाचे समर्थक सुद्धा जाहीरपणे बोलतात ते योग्य नाही. त्यांनी समाजाची दिशाभूल करणे थांबवावे, ही माझी विनंती आहे.
दोन समाजाच्या आंदोलनामध्ये त्यांच्या काही कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून संघर्ष करणाऱ्या नेत्यांना धमक्या देण्याचं काम सुरू आहे. काहींना लिखित स्वरूपात सुद्धा धमक्या आल्या. या धमक्यांमुळे जर काही नेत्यांना असुरक्षितता वाटली असेल आणि त्यांनी जर सरकारकडे सुरक्षेसाठी मागणी केली असेल तर ती त्यांना देण्यात यावी. दरम्यान, शेंडगे यांना असुरक्षित वाटलं असेल म्हणून त्यांनी सुरक्षा मागितली. ती त्यांना मिळाली याचे मी अभिनंदन करतो. ज्यांना सुरक्षेची आवश्यकता आहे, त्यांना सुरक्षा पुरवणे हे सरकारचं कर्तव्यच आहे. कारण हे नेते चारशे जातीच्या समूहाचे नेतृत्व करतात.
आम्ही महाराष्ट्रातील लोकांना आवाहन केले आहे, एखाद्या जातीचा संघर्ष आणि समाजाचा संघर्ष यात फरक असतो. आम्ही चारशे जातीचा समूह असलेला समाज म्हणून एकत्र आहोत. ओबीसी समाजाची जेव्हा वेळ येते. तेव्हा सगळा समाज एकत्र असतो. प्रातिनिधीक स्वरुपात ५ लाख लोक जालन्याला येतील, अशी अपेक्षा आहे, असेही बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा