

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आरोग्य व्यवस्था बघण्यासाठी तीन वेगवेगळ्या शहरात भेटी दिल्या, तिथली व्यवस्था पाहिल्या. राज्यात काही शहरात औषध पुरवठा आणि वाढत्या मृत्यूची चर्चा झाली. मात्र, यावर राजकारण न करता मार्ग काढणे महत्वाचे आहे. याच यंत्रणेच्या कामाची कोव्हिड काळात स्तुती झाली. मात्र, काय आणि कुठे चुकलं? याची माहिती घ्यायला उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
नागपुरातील मेडिकलच्या पाहणीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. औषध पुरवठा मागणीच्या तुलनेत होत नाही. मात्र, हा बेसिक सपोर्ट शासनाने द्यायला पाहिजे. अनेक पद रिक्त आहेत. मुंबईत सुद्धा स्टाफ, औषधांची कमतरता आहे.पावसाच्या दरम्यान अनेक आजार होतात. बाहेर जिल्ह्यातील सुद्धा रुग्ण येतात.आरोग्य सेवा दिली जाते. मात्र, त्याला सरकारची मदत मिळाली पाहिजे. आरोग्य खाते कमी पडत असल्याचे वास्तव यानिमित्ताने पुन्हा एकदा उघड झाले.
आम्ही सुद्धा या विषयावर आंदोलन करू शकलो असतो. पण आम्ही परिस्थिती जाणून घेत आहोत. आम्हाला आंदोलन करता आले असते मात्र आम्ही मार्ग काढायला आलो. आम्ही आंदोलन करू शकलो असतो. कारण इथे मुख्यमंत्री आले नाहीत. जे काही वाईट झालं त्यावर चौकशी होणार आहे. मात्र, पुढे काय? हे महत्त्वाचं आहे. डिनना जास्तीचे अधिकार देण्याची गरज आहे. त्यांना औषध खरेदीची परवानगी दिली पाहिजे. मुळात बाथरूम साफ करणे हे डिनचे काम नाही. पण त्या ठिकाणी इतर यंत्रणा काम करते की नाही? त्यावर लक्ष ठेवण्यासाठी जबाबदाऱ्या वाटून द्यायला पाहिजेत. औषध खरेदी ही वेळेत व्हायलाच पाहिजे.स्वच्छता करणे वाईट नाही. पण डीनकडून हे करून घेणं योग्य नाही. आमदार विकत घ्यायला यांच्याकडे पैसे आहेत. मग औषध घ्यायला का नाही? प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज काढणार. मात्र, डीनसारख्या एकाच व्यक्तीवर भर पडतो म्हणून पद भरती झाली पाहिजे यावर आदित्य ठाकरे यांनी भर दिला.