नागपूर : शहरातील पंचनामे, मनुष्यबळ वाढले सर्वेक्षणाला आली गती | पुढारी

नागपूर : शहरातील पंचनामे, मनुष्यबळ वाढले सर्वेक्षणाला आली गती

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शनिवारी नाग नदीच्या पुरामुळे शहरातील ज्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. त्या घरांचे पंचनामे करण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आज सकाळी या संदर्भात जिल्हा व महानगर प्रशासनाची बैठक झाली. मनुष्यबळ वाढवून दुपारी प्रत्यक्ष पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली.

नागपुरात शनिवारी रात्री मुसळधार पावसामुळे ढगफुटी सदृश्य स्थिती निर्माण झाली .जवळपास चार तासात 109 मिलिमीटर एव्हढा पाऊस अंबाझरी तलाव्याच्या अधिग्रहणक्षेत्रात झाला. त्यामुळे नाग नदीला पूर आल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले. काल यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते.

पंचनाम्याची गती अधिक राहावी यासाठी मनुष्यबळ वाढविण्यात आले आहे. महानगरपालिकेचे ६० कर संग्राहक , १५ महसूल निरीक्षक, १० सहाय्यक अधीक्षक यांची टीम जिल्हा प्रशासनाच्या दिमतीला आली. नागपूर महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या तहसील कार्यालयाकडे उपलब्ध असणाऱ्या १६ तलाठ्यांच्या मदतीला ग्रामीण भागातील आणखी २८ तलाठ्यांची मदत घेण्यात आली आहे. रविवार असला तरी प्रशासन आपल्या पूर्ण गतीने या आपत्कालीन परिस्थितीमध्ये कामी लागले असून दुपारी प्रत्यक्ष पंचनाम्याची सुरुवात करण्यात आली.जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपायुक्त मिलिंद मेश्राम यांच्यासह उपविभागीय अधिकारी तहसीलदार व महसूल विभागाचे तलाठी, महानगरपालिका प्रशासनाचे कर संग्राहक, महसूल निरीक्षक, सहाय्यक अधीक्षक उपस्थित होते.

Back to top button