

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीने अंबाझरी तलावाच्या पाण्याने मोठे नुकसान केले. खरेतर 4 वर्षापासून अंबाझरीने धोक्याची घंटा वाजविली, जल अभ्यासक डॉ प्रवीण महाजन यांनी या संदर्भात माध्यमातून अनेक प्रकारे प्रकाश टाकला. MWRRA कडे जनहित याचिकाही दाखल केली.
आयुक्त व जिल्हाधिकारी यांचेसह अनेक तज्ञ मंडळीची अंबाझरीसह नागपूरातील तलांवासाठी देखरेख समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर मनपाने या आदेशाचे विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यानंतर कोरोना आला. अजूनही ती केस तशीच असल्याचे कळते. यानंतर मनपात बैठक झाली दिलेल्या अहवालातील काही काम करण्याची मान्यता देत त्यांनी हे काम पाटबंधारे विभागाला दिले. त्यानुसार क्षतिग्रस्त सांडव्याचे (स्पीलवेचे) काम करण्यात आले. अजूनही मातीच्या धरणाची डागडुजी केलेली नसल्याने खूप जास्त प्रमाणात धोका कायम आहे. स्पिलवेचे काम झाले नसते तर आज जी परीस्थिती अंबाझरीच्या पाण्यानी नागपूरकराची झाली त्यापेक्षा भयानक परीस्थिती निर्माण झाली असती.
आज जे 10 फूट पाणी रामदासपेठ, बर्डीत दिसले ते 20 ते 30 फूटापेक्षा जास्त असते. आज जो प्रलय दिसतो त्यापेक्षा महाभंयकर प्रलय झाला असता, तो वेळीच सांडवा दुरूस्त झाल्याने (स्पिलवे) नागपूर वाचले. आज जे घडले ते जर घडू नये असे वाटत असेल तर खालील उपाय योजना राबविण्यात याव्यात. नागनदीवरील अतिक्रमण काढावे लागेल. अंबाझरीतील गाळ काढून क्षमता वाढवावी लागेल. नाल्या साफ करून पाण्याचा प्रवाह कुठेही थांबणार नाही यादृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्या लागतील. घरापेक्षा जे सिमेंट रोड वर झाले ते डिझाईन बदलावे लागेल. सिमेंट पेव्हर लावतांना पाण्याचा निचरा जलद होण्याकरीता पेव्हर सिमेंट मध्ये न लावता काळ्या गिट्टी पावडर मध्ये लावल्यास पाणी जागोजागी काही प्रमाणात जमिनित मुरविता येवून पाण्याची गती कमी होण्यास मदत होईल. घरो घरी रेनवॉटर हार्वेस्टिंग झालेे असते तर पाण्याचा प्रवाह कमी होण्यास मदत झाली असती.
या अगोदर अनेक शहरातील ढगफुटीचा अभ्यास करून उपाययोजना राबविल्या असत्या तर नुकसान टाळता आले असते पण घटना घडून गेल्यावर जागे होण्यात काहीच अर्थ असतो. आज या घटनेला नैसगिक अपत्ती हे गोडस नांव देवून सोडून देता येणार नाही. सरकारी यंत्रणांनी जागरूक राहून काम करावे लागेल याकडे याविषयी सातत्याने पाठपुरावा करणारे जल अभ्यासक, डॉ. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कार्थी, चला जाणूया नदीला राज्यस्तरीय समिती सदस्य डॉ. प्रवीण महाजन यांनी 'पुढारी' शी बोलताना लक्ष वेधले.