नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्ववादी आहेत. ते नेहमी नवस फेडायला दिल्लीत जातात. सीमावादाच्या मुद्द्यावर ते नवस केव्हा फेडणार? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख आणि विधान परिषदेचे सदस्य उद्धव ठाकरे यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केला. आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत. वातीही बाहेर काढून ठेवल्या आहेत. आता फक्त पेटवायचा अवकाश आहे, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
हिवाळी अधिवेशनात मराठवाडा विदर्भाच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी होती. मात्र सत्ताधार्यांनीच गोंधळ घातल्यामुळे अधिवेशनाचे तीन दिवस वाया गेले. याचा जाब सत्ताधार्यांनाच विचारावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राज्यातील सरकार असंवैधानिक आहे, असे म्हटले आहे. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, स्वामींनी त्यांना घरचा आहेर दिला आहे. आज विधिमंडळात सीमावादाचा महत्त्वाचा मुद्दा मांडला जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. त्यांना दिल्लीला जाण्याची गरज काय होती, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.