गोंदिया, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र दारुबंदी कायदयान्वये गुन्हे दाखल असलेले जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील चान्ना आणि बाक्टी येथील २ अट्टल गुन्हेगारांना ४० दिवसांकरीता गोंदिया जिल्ह्याच्या हद्दीतुन हदपार करण्यात आले आहे. सदर निर्देश अर्जुनी-मोरगाव उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिले. राहुल चंद्रेभान मेश्राम (वय ४०) शैलेश संतोष शहारे, (वय ४०) दोघेही राहणार चान्ना/बाक्टी ता. अर्जुनी/मोरगाव, जि. गोंदिया असे हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुक आणि नवरात्रोत्सव २०२४ च्या अनुषंगाने गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे, महाराष्ट्र शासन तसेच जिल्हा दंडाधिकारी यांचे कडून जिल्ह्यातील सराईत गुन्हेगाराच्या अवैध कृतीवर लगाम घालण्यासाठी विविध प्रतिबंधकात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था सार्वजनिक शांतता अबाधीत राहावी, वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने उपविभागीय दंडाधिकारी, अर्जुनी/मोरगाव यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदयान्वये ९ गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगार राहुल मेश्राम व ७ गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगार शैलेश शहारे या दोघांना ४० दिवसांकरिता गोंदिया जिल्ह्याच्या हद्दीतुन हद्दपार करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. सदरच्या दोन्ही सराईत गुन्हेगारांवर अवैधपणे वेगवेगळ्या साथीदारांसोबत अवैधरित्या विनापास परवाना मोहफुलाची हातभट्टी दारु, देशी दारु विक्री करणे, आदी गुन्हे दाखल असुन सराईत गुन्हेगार यांचे कार्यक्षेत्र हद्दीतील जनमाणसात असलेली भीती, लोकांच्या दैनंदिन जीवनावर सार्वजनिक सुव्यवस्थेवर होणारा परिणाम/बाधा होणारे गुन्हे, सराईत गुन्हेगाराच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध घालण्याकरीता त्यांचेवर गुन्हे नोंद केले आहेत.
सार्वजनिक शांतता अबाधित राहावी त्याबरोबरच बेकायदेशिर बाबींना कोणताही थारा दिला जात नाही हा संदेश जनमानसात जावा याकरीता अर्जुनी/मोरगाव चे ठाणेदार कमलेश सोनटक्के, यांनी उपविभागीय दंडाधिकारी यांचेकडे सराईत गुन्हेगारावर हद्दपारीची करवाईचे प्रस्ताव सादर केले होते.