हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाचे संकट ओढवले असताना दिवसभर कडक ऊन तापल्यानंतर सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल होऊन वादळाला सुरुवात होत कही भागात पावसाच्या सरी तर काही भागात तुरळक पावसाची नोंद करण्यात येत आहे. दरम्यान, आज, सायंकाळी गोंदिया शहरासह जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सडक अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सर्वत्र विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. तर काही भागात गारपीट पडल्याचेही सांगण्यात येत आहे. विशेषतः देवरी शहरातील आठवडी बाजार असल्याने खरेदीसाठी आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांची या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. तर या पावसामुळे जिल्ह्यातील गहू व मका पिकाला याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ऊन-सावल्यांचा खेळ सुरु असतानाच ढगाळ वातावरणामुळे आंबा फळासह भाजीपाला पिकाला फटका बसत आहे.