जिल्ह्यात रविवारी (दि.20) सकाळपासून दिवसभर मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे गडचिरोली-चामोर्शी आणि आलापल्ली-भामरागड या मार्गांसह जिल्ह्यातील ४० मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. या पूरामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
मागील चोवीस तासांत धानोरा तालुक्यात सर्वाधिक १५४.२ मिलिमीटर पाऊस झाला. त्याखालोखाल गडचिरोली तालुक्यात १२०.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात १ जूनपासून आजपर्यंत सरासरी १६२.९ टक्के पाऊस पडला आहे. अपेक्षित पर्जन्यमानापेक्षा ३७६ मिलिमीटर पाऊस जास्त पडला आहे.
शनिवारी (दि.27) जुलैला हेमलकसा-भामरागडदरम्यानच्या पुरात अडकलेले ३५ नागरिक आणि ३ मुलांना एसडीआरएफ आणि महसूल विभागाच्या पथकाने सुरक्षितरित्या बाहेर काढले. शिवाय गडचिरोली तालुक्यातील रानमूल येथे पुराने वेढलेल्या २ व्यक्तींचेही प्राण वाचविण्यात आले. आज पोलिस भरतीची लेखी परीक्षा होती. त्यासाठी येणाऱ्या युवक, युवतींनाही आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने पूरग्रस्त भागातून सुखरुप येण्यास मदत केली. दरम्यान २७ जुलैला गोसेखुर्द धरणातून ४७ लाख क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग होत होता. आज तो ३ लाख क्यूमेक्स करण्यात आला असून, पुन्हा वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे गडचिरोली-नागपूर मार्ग पुन्हा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.