

गडचिरोली : मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीच्या यात्रेला आलेल्या एका युवकाचा आंघोळ करीत असताना वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.२६) दुपारी साडेबाराच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याच्या हद्दीत घडली. अभिषेक संतोष (वय २४, रा.चंद्रपूर) असे मृत युवकाचे नाव आहे.
चंद्रपूर येथील महाकाली वॉर्डात राहणारे अभिषेक संतोष, जितू दुर्गे (वय २०) व खुशाल सोनवणे (वय १८) हे तिघे आणि अन्य दोघे गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव येथे भरलेल्या महाशिवरात्री यात्रेसाठी येण्यास निघाले. मार्कडादेव येथे पोहचण्यापूर्वी वैनगंगा नदीच्या साखरी घाटावर ते तिघेही आंघोळीसाठी थांबले. जितू व खुशाल हे एका ठिकाणी, तर अभिषेक हा थोड्या अंतरावर आंघोळ करीत होता. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही खोल पाण्यात बुडाले. तिघांनीही आरडाओरड करताच जवळ असलेल्या नागरिकांनी जितू व खुशाल या दोघांचा जीव वाचविले मात्र अभिषेक याला वाचविण्यात त्यांना यश आले नाही. मार्कंडादेव यात्रेत एसडीआरएफचे ५ पथक तैनात होते. परंतु घटनास्थळ मंदिरापासून ते जास्त अंतरावर असल्याने आणि त्यांना याची माहिती मिळाली नाही, दुर्दैवीने संतोषचा बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच चामोर्शीचे पोलिस आणि एसडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अभिषेकचा मृतदेह शोधून काढला. पोलिस निरीक्षक अमुल कादबाने यांच्या मार्गदर्शनात पोलिस नाईक अविनाश कासशेट्टीवार करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच चामोर्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित यादव, प्रभारी तहसीलदार अविनाश शेबटवार, नायब तहसीलदार राजू वैद्य यांनी घटनास्थळी भेट दिली.