

गडचिरोली,: जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात आल्यानंतरही भामरागड तालुक्यातील फुलणार पोलिस मदत केंद्रांतर्गतच्या परिसरात नक्षल्यांच्या नावाने पत्रके टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
जोगा धुर्वा(४०), मालू धुर्वा(४२) दोघेही रा.मिळगुडवंचा, दलसू तेलामी (५०) रा.कृष्णार,चैतू धुर्वा(५३), रा.दोबूर,गणेश आलामी(४०)रा.पोयारकोठी व राजेश वड्डे(३२) रा.मिरगुळवंचा अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी ऑपरेशन 'प्रहार' राबविल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात आला असून, पोलिस दलाच्या अभिलेखावर एकही नक्षलवादी शिल्लक नाही. असे असतानाही काही जण नक्षल्यांच्या नावाने बॅनर आणि पत्रके टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तीन दिवसांपूर्वीच एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी परिसरात बॅनर व पत्रके टाकणाऱ्या युवकांना पोलिसांनी अटक केली. त्याच सुमारास भामरागड तालुक्यातील फुलणार पोलिस मदत केंद्रांतर्गत हिद्दूर-दोबूर मार्गावर लाल रंगाचे बॅनर आणि पोस्टर लावले होते. त्यावर नागरिकांच्या मनात भीती निर्माण होईल,असा मजकूर लिहिला होता. त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवून सहा जणांवर कोठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.
नक्षल सप्ताहाचा पहिला दिवस शांततेत
दरवर्षी नक्षलवादी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह साजरा करतात. यादरम्यान ते विविध चकमकीत व अन्य कारणांनी मृत्यूमुखी पडलेल्या नक्षल्यांची स्मारके उभारुन त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात. पूर्वी बरेचदा दुर्गम भागातील वाहतूक आणि बाजारपेठाही बंद असायच्या. परंतु आता जिल्ह्यात एकही नक्षलवादी शिल्लक नसल्याने नक्षल सप्ताहाबाबतची भीती पूर्णपणे नष्ट झाली आहे.