

Vasantrao Naik Sheti Nishta Purskar
गडचिरोली : जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना सन प्रतिष्ठेच्या 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार' जाहीर केला आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उत्पादनवाढीसाठी केलेले प्रयोग आणि इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणाऱ्या कार्यामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकरी, संस्था आणि कृषी क्षेत्रातील कार्यकर्त्यांना दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.
त्याअनुषंगाने सन २०२३-२४ साठीचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गटातून आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील शेतकरी विष्णूपद गाईन, तर आदिवासी गटातून एटापल्ली तालुक्यातील वडसाकला येथील दयाराम सिडाम यांना जाहीर झाला आहे.
सन २०२४-२५ च्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी सर्वसाधारण गटातून आरमोरी तालुक्यातील कोरेगाव(रांगी) येथील शेतकरी पुरुषोत्तम जांभूळकर यांची निवड करण्यात आली आहे.
४४ हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. १ जुलै रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.