गडचिरोलीत विभागीय बैठक मित्रपक्षांवर काँग्रेसची कुरघोडी?  | पुढारी

गडचिरोलीत विभागीय बैठक मित्रपक्षांवर काँग्रेसची कुरघोडी? 

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : गेली अनेक वर्षे अतिशय दुर्गम, उपेक्षित असलेल्या गडचिरोलीचे बदलते अर्थकारण सर्वच पक्षांसाठी सध्या महत्वाचे ठरत असल्याचे दिसत आहे. यातूनच सत्तापक्षासोबतच विरोधकांनी देखील महत्व देण्याचे धोरण स्वीकारले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या एकत्रित होण्याच्या शक्यतेने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.काँग्रेसची पहिल्यांदा  दुर्गम अशा गडचिरोलीत शनिवारी झालेल्या विभागीय बैठकीकडे या दृष्टीने महत्व आले आहे. पक्ष राहिला तर आपण हे लक्षात घेता मतभेद विसरून कामाला लागण्याचे आवाहन राज्याचे प्रभारी रमेश चेनीथला यांनी केले आहे. 18 जानेवारी रोजी अमरावतीत विभागीय बैठक झाली. नागपुरात नेते,पदाधिकारी चर्चा केली.
महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप ठरत नसतानाच लोकसभा निवडणुकीत आपला वरचष्मा राखण्यासाठी काँग्रेसने विभागनिहाय बैठका घेण्याचे जाहीर केले असून महाविकास आघाडीतील घटकपक्षांवर यानिमित्ताने काँग्रेसची कुरघोडी सुरु असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वूमीवर मिशन ४५ म्हणत महायुतीने तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र अजून ठरले नाही. त्यातच आता काँग्रेसने विभागीय बैठकांना सुरुवात केली आहे. यानंतर २३ जानेवारी रोजी पश्चिम महाराष्ट्रची बैठक पुणे येथे, कोकण विभागाची २४ जानेवारी रोजी भिवंडी येथे, २७ जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक धुळे येथे तर २९ जानेवारी रोजी मराठवाडा विभागाची बैठक लातूर येथे होणार आहे.राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, चंद्रकांत हांडोरे, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे यांच्यासह जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या विभागीय बैठका होणार आहेत. अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राममय वातावरणात काँग्रेसच्या या बैठकांना कितपत प्रतिसाद मिळणार हे येणारा काळच सांगणार आहे.

Back to top button