गडचिरोली : चित्तरंजनपूरमध्ये तिहेरी अपघातात दोघेजण ठार, तिघे जखमी | पुढारी

गडचिरोली : चित्तरंजनपूरमध्ये तिहेरी अपघातात दोघेजण ठार, तिघे जखमी

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : अनखोडा ते चार्मोशी मार्गावरील चित्तरंजनपूर येथे तिहेरी अपघातात दोघेजण जागीच ठार झाले तर, तिघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (दि. २७) दुपारी दोन वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील चित्तरंजनपूर येथे घडली.

चित्तरंजनपूर येथे दोन मोटार सायकलची धडक झाली, दरम्यान रस्त्यावर पडलेल्या दोन्ही दुचाकींना ट्रकने धडक दिली. या अपघातात रामेश्वर गंगाधर कुंभमवार (३८ रा.अनखोडा), रियांश धनराज वाढई (८ रा. जामगिरी, ता.चामोर्शी) या दोघांचा मृत्यू झाला. रामेश्वर कुंभमवार आणि प्रकाश नागुलवार हे दोघेजण मोटारसायकलने अनखोडा येथून चामोर्शीच्या दिशेने जात होते. याचवेळी धनराज वाढई हेआणखी एक दुचाकीस्वार येनापूरच्या दिशेने येत होते. वाढई यांच्यासोबत मुलगी रियांश (वय ८) ही देखील सोबत होती. दरम्यान कुंभमवार आणि वाढई या दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. यामुळे दोन्ही मोटारसायकलींवरील सर्वजण खाली कोसळले. यामध्ये गडचिरोलीकडून वेगाने येणाऱ्या ट्रकच्या मागच्या चाकात रामेश्वर कुंभमवार हे अडकले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शिवाय रियांश वाढई या मुलीनेही प्राण सोडला. या अपघातात प्रकाश नागुलवार, धनराज वाढई व एक महिला जखमी झाले. येनापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर तिघांनाही चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. माहिती मिळाल्यानंतर चामोर्शीचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. याप्रकरणी ट्रकचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आष्टी पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

Back to top button