

चंद्रपूर : पळसगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कॅम्पिंग साईटवर (विश्रामगृह) निवड केलेल्या झांशी राणी महिला बचतगटाच्या मासिक उत्पन्नातून एकूण 5 टक्के रक्कम विकासाच्या नावावर वन समितीच्या बँक खात्यात जमा करण्याची अट लावल्याने आक्रमक झालेल्या बचतगट महिला व गावकऱ्यांनी ताडोबा अभयारण्याचे चिमूर तालुक्यातील मदनापूरचे प्रवेशद्वार बंद पाडले आहे. मागील चार दिवसांपासून या प्रवेशद्वारातून एकही पर्यटक ताडोबात पर्यटनासाठी गेला नाही. सदर अट जो पर्यंत रद्द होणार नाही तो पर्यंत प्रवेशद्वार सुरू करणार नाही अशी भूमिका मदनापूर येथील गावकऱ्यांनी घेतल्याने वनविभाग व गावकऱ्यांमधील वाद पेटण्याची शक्यता आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा अभयारण्य जगभरात व्याघ्र दर्शनासाठी प्रसिध्द आहे. ताडोबा अभयारण्याचे बफरझोनमध्ये सहा प्रवेशद्वार एकट्या चिमुर तालुक्यात आहे. त्या मध्ये निमढेला, अलीझंझा, कोलारा, मदनापूर, गोंडमोहाडी व पळसगाव आदींचा समावेश आहे. पळसगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या मदनापूर कॅम्पिंग साईटवर (विश्राम गृहावर) मागील चार ते पाच वर्षांपासून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकरीता स्वयंपाक बनविण्याचे कंत्राट ग्रामसभेमध्ये निवड करून बचतगटाला दिले जाते. यावेळी मार्च महिण्यात मदनापूर येथील झांशी राणी बचतगटाची ग्रामसभेमध्ये निवड करण्यात आली. परंतु त्यांना दिलेल्या आदेशात वन परिक्षेत्राधिकरी योगीता आत्राम यांनी, बचतगटाच्या मासिक उत्पन्नाच्या एकूण 5 टक्के रक्कम विकासासाठी वनसमितीला जमा करण्याची अट लावली. बचतगट महिलांच्या हाती आदेश पडताच नव्याने लावण्यात आलेल्या या अटीचा कडाडून विरोध करण्यात आला. सदर अट रद्द करण्याची मागणी आत्राम यांचेकडे करण्यात आली, परंतु सदर मागणीला त्यांनी ठेंगा दाखवून 5 टक्के रक्कम भरावेच लागेल अशी ताठर भूमिका वन परिक्षेत्राधिकारी यांनी घेतली.
विशेष म्हणजे ताडोबाच्या मदनापूर पर्यटन प्रवेशद्वारावरून मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनाकरीता येतात. परंतु कॅम्पिंग साईटवर भोजनासाठी फारसे येत नाही. भोजनला पर्यटकांचा प्रतिसाद कमी असल्याने मिळणारे उत्पन्न् फारस कमी आहे. अशा स्थितीत 5 टक्के रक्कम समितीमध्ये जमा करणे या बचतगटातला परवडणारे नव्हते. त्यामुळे अट रद्द करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर 8 एप्रिलला सकाळी बचतगट महिला व गावकऱ्यांनी मदनापूर प्रवेशद्वार काठ्या,दगड प्रवेशद्वाराजवळ मांडून बंद पाडले. मागील चार दिवसांपासून आजमितीस मदनापूर पर्यटन प्रवेशद्वार बंद आहे. मदनापूर गावातील 16 जिप्सी आहेत तर तेवढेच गाईड आहेत. सध्या या प्रवेशद्वारावरून पर्यटन बंद असल्याने त्यांना घरीच राहावे लागत आहे. या प्रकरणामुळे त्यांचाही रोजगार बुडत आहे.