

Chandrapur Tiger Kills two Person Tiger Terror in Mool
चंद्रपूर : जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेली एक महिला आज (दि.२७) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास, तर बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्यावर आज दुपारी 1च्या सुमारास वाघाने हल्ला करून ठार केले. संजीवनी संजय मॅकलवार (वय 45, रा. चिरोली) तर सुरेश मुंगरू सोपानकर (वय 52, रा. कातांपेठ) अशी मृतांची नावे आहेत. एकाच दिवशी तासाच्या अंतरात वाघाने दोघांचा बळी घेतल्याने 10 मे पासून 17 दिवसात 11 जणांचे बळी गेले आहेत. एकट्या मुल तालुक्यातील सहा जणांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये वाघाची दशहत पसरली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूल तालुक्यातील चिरोली येथील महिला सजिवंनी संजय मॅकलवार ही महिला पती व अन्य तिघा नातेवाईकांसह वनविकास महामंडळाच्या कंपार्टमेंट नं. 524 मधील भगवानपूर जंगलात आज (दि.२७) सकाळी सरपण आणण्यासाठी गेली होती. चौघेही जण सरपण व व कुड्याचा फूल गोळा करत असताना त्याच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने संजिवनीवर हल्ला चढविला. तिने आरडाओरड केल्याने काही अंतरावर असलेल्या पती व सहकाऱ्यांना वाघाने हल्ला केल्याचे लक्षात आले. लगेच वाघाच्या दिशेने पती व सहकाऱ्यांन धाव घेऊन वाघाला हाकलण्यासाठी प्रचंड आरडाओरड केली. त्यामुळे घाबरून वाघ पळून गेला, परंतु तो पर्यंत वाघाच्या हल्या संजिवनी ठार झाली होती. सदर घटना गावात माहिती होताच नागरिक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागालामाहिती देण्यात आली. वनपरिक्षेत्राधिकारी बोथे, वनपाल शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह तर पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले.
दुसरी घटना चार तासानंतर 1 वाजताचे सुमारास याच परिसरात चिरोली गावालगत जंगलात घडली. 52 वर्षीय सुरेश मुंगरू सोपानकार हा गुराखी स्वतचे शेळ्या (बकऱ्या)चारण्यासाठी गेला होता. बाराचे सुमारास त्याचे बकऱ्यांचा कळप घरी परत आला, परंतु तो आला नाही. त्यामुळे कुटूंबियांना व गावकऱ्यांना संशय आला. वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाने चिरोली येथे येऊन शेळ्या चारायला घेऊन गेलेल्या गावाजगतच्या जंगलात शोध मोहिम आरंभली. काही अंतरावरच त्याचा मृतेदह वाघाने खाल्याने छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. दोन्ही घटना जवळच असल्याने एकाच वाघाने सकाळी महिलेला व चार तासाच्या अंतराने दुपारी 1 वाजता सुरेश सोपानकार याला ठार केल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. दोन्ही घटनांनी पुन्हा चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. सतत वाघाच्या हल्यात शेतकरी, शेतमजूर, गुराख्यांचे जीव जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. वनविभाग कोणतीही उपाययोजना करीत नसल्याने नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत.
10 मे पासून आज 27 मे पर्यंत एकूण 17 दिवसात 11 जणांचा वाघाच्या हल्यात बळी गेला आहे. त्यापैकी 7 जण हे जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेले होते. तिघे जण जनावरे चारण्यासाठी केले होते.तर एक महिला जंगलात सरपण आणण्यासाठी गेली होती्. होता. एकापाठोपा झालेल्या दोन्ही घटनांनी चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. वनविभाग नागरिकांवर होणारे वाघांचे हल्ले रोखण्यास अपशेल अपयशी ठरला आहे.
नागरिकांकडून वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी सतत होत असतानाही वनविभा गाने काहीही उपाययोजना आखल्या नाहीत. त्यामुळे दर दिवशी सामान्य नागरिकांचे बळी जात आहेत. नेत्यांच्या बैठकांवर बैठका होत आहेत. प्रशासन वाघांचा बंदोबस्त करीत असल्याच्या फोकळ वल्ग्ना करीत असल्याने 10 मे पासून आज 27 मे पर्यंत 17 दिवसात 11 जणांचे बळी गेले आहे.
10 मेला सिंदेवाही तालुक्यातील एकाच दिवशी 3 महिलांचा मृत्यू
11 मे ला मुल तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू
12 मे ला मुल तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू
14 मे ला चिमूर तालुक्याती एका महिलेचा मृत्यू
18 मे ला नागभिड व मुल तालुक्यातील दोघा इसमांचा मृत्यू
22 मे ला पुन्हा मुल तालुक्यातील एकाचा मृत्यू व एक जखमी
27 मे ला पुन्हा मुल तालुक्यातील एक महिला व एक पुरूश अशा दोघांचा मृत्यू झाला.
आता पर्यंत 17 दिवसात 11 जणांचे बळी गेले आहेत, दर दिवशी वाघांच्या हल्यात नागरिकांचे बळी जात आहेत.