शनिवार (दि.27) रात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर शहरातील झरपट नदीमधून एक कार वाहत गेली असून कारमधील दोघे सुदैवाने बचावले आहेत. ब्रम्हपुरी तालुक्यात वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याने ग्रामीण भागातील नाल्यांना पूर आल्याने सात गावांचा तालुक्यांशी संपर्क तुटला आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक ग्रामीण मार्ग बंद झाले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात संततधार सुरू आहे. मोठे व मध्यम प्रकल्पासह तलाव तुडूंब भरले आहेत. जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. छोट्या मोठ्या नाल्यांना पुरे आला आहे. चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी मर्गावरील स्मशानभूमीसमोर असलेल्या पुलावरून पाणी वाहत असताना रविवारी (दि.28) सायंकाळी साडेचारच्या सुमारास दोन युवकांनी पुराच्या पाण्यात कार नेली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वाहन पुलावरून नाल्यात वाहून गेले. सुदैवाने दोघेही वाहनातून बाहेर आल्याने जीव वाचला. मात्र कार वाहून गेली. सायंकाळ पर्यंत त्या कारचा शोध लागलेला नव्हता.
चिमूर तालुक्यातील उमा नदी दुथडी भरून वाहत आहे. नेरी सिरपूरमार्ग बंद झाला आहे. सिरपूर गावाजवळील नाल्याला पूर आला आहे. तसेच खुटाळा गावाजवळ पूर आल्याने सिंदेवाही कडे जाणारा मार्गही बंद झाला आहे. वरोरा तालुक्यातील शेगाव चंदनखेडा मार्गावरील पार्वती गावाजवळ नाल्याला पूर आल्याने हा मार्ग बंद झाला आहे.
शनिवार पासून सुरू असलेल्या संततधार पावसाची नोंद करण्यात आली. त्यामध्ये सर्वाज जास्त पाऊस धान उत्पादक तालुक्यात पडला आहे. सावली तालुका 106.5, मुल 102.1, नागभिड 96.8, चिमूर 76.9 ब्रम्हपूरी 76.8,सिंदेवाही 72.5, चंद्रपूर 56.7, पोंभूर्णा 50.0 पावासची नोदं करण्यात आली. उर्वरित तालुक्यात 50 च्या आत नोंद करण्यात आली आहे. काल शनिवार पासून जिल्ह्यात सुरू असलेला संततधार पावसाचा आज रविवारी चांगलाच जोर वाढला.