

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४:२२ वाजून १२ सेकंदांनी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ३.४ इतकी नोंदविण्यात आली आहे.
या भूकंपाचे स्थानांक अक्षांश १९.७४२ उत्तर व रेखांश ७९.२४० पूर्व असून, तो जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर खोलीवर निर्माण झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील हरदोना गाव हे जिल्ह्यातील प्रमुख केंद्रबिंदू मानले जात आहे तसेच तेलंगणातील करीमनगर हा भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे.
भूकंपाचे धक्के सौम्य स्वरूपाचे असल्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, अचानक धक्क्यांमुळे काही भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, गोदावरी नदीचे पाणी जमिनीत झिरपल्यामुळे भूगर्भातील हालचालींना चालना मिळून अशा प्रकारचे सूक्ष्म भूकंप होण्याची शक्यता असते. प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.