

चंद्रपूर : यावर्षी जगातून २ सूर्य आणि २ चंद्र ग्रहने दिसत असली तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच चंद्रग्रहण दिसणार आहेत. भारतातून संध्याकाळी चंद्र उगविताच अरुणाचल प्रदेशातून खग्रास तर महाराष्ट्रातून खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुप , महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे ह्यांनी दिली आहे.
खरं तर भारतातून चंद्र अदृष्य असताना दुपारी ०३.२० वाजता खंडग्रास ग्रहणाला सुरवात होईल. तर ४.३४ वाजता खग्रास चंद्रग्रहण दिसेल आणि ५.३२ मिनिटांनी खग्रास ग्रहण संपेल.भारतातूंन केवळ अरुणाचल प्रदेशातून खग्रास चंद्रग्रहण दिसेल. कोलकाता येथून ९० %, टक्के ,गडचिरोली येथून ३० टक्के, चंद्रपूर, नागपूर येथून चंद्र उगवताना २५ टक्के ,पुणे येथे १० टक्के तर मुंबई येथे उंचीवर केवळ १ टक्के खंडग्रास ग्रहण दिसेल. विदर्भात संध्याकाळी ६.१८ ते ७.३३ वाजता अल्प ग्रहण दिसेल.
हे ग्रहण पाकिस्तान,अफगाणिस्तान पासून भारतासहीत पुर्वेकडील देश आष्ट्रेलिया, आशिया, अमेरिका येथे दिसेल.ह्यापूर्वी जगातील काही स्थळी १७ फेब्रुवारी ला कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते तसेच पुढे १२ ऑगस्ट रोजी खग्रास सूर्यग्रहण तर २८ ऑगस्ट रोजी खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे.
महाराष्ट्रातून केवळ १ तास ३५ मिनिटेच अल्प ग्रहण दिसेल.आणि हे ग्रहण पूर्व क्षितिजावर असल्याने फारसे सुंदर दिसणार नाही. घरावरून किंवा टेकडीवरून हे ग्रहण थोडे चांगले दिसेल. ग्रहण दुर्बिणीने फारसे चांगले दिसत नसल्याने साध्या डोळ्याने ते पाहिले पाहिजे.ग्रहणे ही वैज्ञानिक घटना असल्यामुळे त्यांचा वैज्ञानिक दृष्ट्या निरीक्षण आणि अभ्यास केला पाहिजे असे प्रा सुरेश चोपणे ह्यांनी सांगितले आहे.