

चंद्रपूर: घुग्घुस शहरातील गजबजलेल्या शिवाजी चौकात बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण अपघात घडला. चंद्रपूरच्या दिशेने जात असलेल्या टीजी 29 टी 2969 क्रमांकाच्या भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरून घरी परतणारे दोन वेकोलि कर्मचारी गंभीर जखमी झाले. ट्रकच्या टायरखाली त्यांचे पाय चिरडले गेले, त्यामुळे दोघांचेही पाय गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
जखमींची नावे संजय पाल (वेकोली, मुंगोली खाण) आणि उद्धव मोरे (वेकोली, कोलगाव खाण) अशी असून, दोघेही कैलास नगर वेकोलि वसाहतीचे रहिवासी आहेत. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना घुग्घुसमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथील मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
शिवाजी चौक हा घुग्घुसमधील मुख्य चौक असून, येथे दररोज शेकडो अवजड वाहने ये-जा करतात. बसस्थानक आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे येथे कायम गर्दी आणि वाहतुकीची कोंडी असते. परिणामी, हा चौक अपघातांचा 'हॉटस्पॉट' ठरला आहे. मागील वर्षभरात येथे झालेल्या अपघातांमुळे नगरपरिषदेकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र, काही राजकीय हस्तक्षेपांमुळे अतिक्रमण पुन्हा सुरू झाले. वाहतूक नियमांचे पालन न होणे आणि रस्त्यावरची गर्दी ही अपघातांची मुख्य कारणे ठरत आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेकांनी प्रशासनावर टीका करत, वेळेत अतिक्रमण हटवले असते तर हा अपघात टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया दिली आहे.