चंद्रपूर : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतात गळफास घेऊन शेतकऱ्याने जीवन संपविले. ही घटना सोमवारी (दि.७) सकाळी साडेआकराच्या सुमारास घडली. युवराज रामचंद्र वासेकर (वय ४०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. तो मुल तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी होता.
मुल तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी युवराज वासेकर या शेतकऱ्याची शेती उमा नदीच्या काठावर आहे. त्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. सोमवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे शेताला पाणी देण्यासाठी गेले होते. मागील काही वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे तो चिंताग्रस्त होता. तसेच कर्जबाजारी झाला होता. या नैराश्येतून त्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले. ही बाब तेथील काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कुटुंबियांना याची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबियांसह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांची संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाचा पंचनामा केली. त्यानंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड.कन्स्टेबल काटकर करीत आहेत.