
चंद्रपूर : आज रविवारी (१८मे) चंद्रपूर जिल्ह्यात मुल आणि नागभीड तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघाच्या हल्ल्यात दोघांचा एकाच दिवशी मृत्यू झाला. नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील मारोती नकडू शेंडे (६४) हा तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेला होता तर मूल तालुक्यातील भादुर्णी येथील ऋषी झुगांजी पेंदोर (वय 70) हा जंगलात बकऱ्या चरण्यासाठी गेला होता.
पहिल्या घटनेत नागभीड तालुक्यातील तळोधी बा वनपरिक्षेत्रातील आलेवाही बीटमधील कक्ष क्रमांक 697 मध्ये (तलाव परिसरात) आज रविवारी वाढोणा येथील मारोती नकडू शेंडे हा इसम आपली पत्नी व अन्य नागरिकांसह सकाळी तेंदूपत्ता तोडण्यासाठी सकाळी गेला होता. तलाव परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याचेवर मागून हल्ला केला. हल्ला होताच सदर इसमाने प्रचंड आरडाओरडा केली. लगतचे लोकं वाचविण्यासाठी धावून आले. त्यामुळे वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. परंतु जोरदार झालेल्या वाघाच्या हल्ल्यात सदर इसम गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती गावात होताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. लगेच वन विभागाला माहिती देण्यात आली. वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गंभीर जखमी इसमाला तातडीने वाढोणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक उपचार करून सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान गंभीर जखमी मारोती नकटु शेंडे या इसमाचा मृत्यू झाला.
दुसरी घटना मूल तालुक्यात घडली. मूल येथील बफर कार्यालयातंर्गत येत असलेल्या भादूर्णीत येथील ऋषी झुगांजी पेंदोर (वय 70) हा इसम काल शनिवारी बकऱ्या चरण्यासाठी गेला होता. रात्र होवूनही घरी परत न आल्यामुळे रात्री कुटुंबीयांनी शोधाशोध केली परंतु शोध लागला नाही. वनविभागाला माहिती देण्यात आली. आज रविवारी सकाळी वन विभागाने शोध मोहीम राबविली. कम्पार्टमेंट नंबर 1008 च्या जंगलात शिवापूर चकच्या भागात त्याच्या शरीराचे अवयव आढळून आले. संपूर्ण शरीर वाघाने खाल्याने डोक्याचा भाग व एक हात तेवढा शिल्लक वनाधिकाऱ्यांना आढळून आला. याच गावात पत्ता तोडण्यासाठी गेलेल्या एका महिलेचाही वाघाच्या हल्ल्यात नुकताच मृत्यू झाला आहे
मूल आणि नागभीड तालुक्यात या घटनेमुळे वाघांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. काही दिवसापासून नागभीड व मूल तालुक्यात तेंदूपत्ता तोडण्याचा काम सुरू आहे. शेतकरी शेतमजूर गोरगरीब तेंदूपत्ता तोडून त्यापासून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर उदरनिर्वाह करीत आहेत. आजच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. तेंदूपत्ता तोडाईवर संकट ओढवले आहे.
- १० मे ला सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल गावातील सारिका शालीक शेंडे( वय ५५), कांता बुद्धाची चौधरी (वय ६०), शुभांगी मनोज चौधरी (वय ३१) ह्या महिला तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. तेंदुपत्ता तोडत असतानाच एकापाठोपाठ तिघींनाही डोंगरगाव बीटातील 1355 कंपार्टमेंट मध्ये ठार केले. या मध्ये एकाच एकाच कुटुंबातील सासू व सुनेचा समावेश आहे.
- ११ मे ला मूल तालुक्यातील नागाळा गावातील विमल बुद्धाजी शेंडे ही महिला चिचप्पली वनपरिक्षेत्रातील 537 कंपार्टमेंटमध्ये तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेली होती. त्या ठिकाणी वाघाने वृद्ध महिलेवर हल्ला केला. त्या मध्ये ती ठार झाली.
- १२ मे ला त्याच मूल तालुक्यात वडीलांकडे राहत असलेल्या भादुर्णा येथील भूमिका दिपक भेंडारे ही महिला आई, वडील, काका, काकू आणि पत्तीसह बफर क्षेत्रातील भादुर्णा बिटातील 793 मध्ये गेली होती. जंगलात तेंदुपत्ता तोडत असतानाच पतीसमोरच तिला वाघाने ठार केले.
- १४ मे ला चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरीक्षेत्रामधील करबडा येथील कक्ष क्र ८६२ मध्ये कचराबाई अरुण भरडे (५४) ही महिला तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेली होती. सकाळी नऊच्या सुमारास वाघाने तिला ठार केले.
- त्यानंतर आज रविवार १८ मे ला नागभीड व मूल तालुक्यात दोघांचा वाघाने बळी घेतला.