चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : ब्रिटीशकालीन घोडाझरी तलावाचा मुख्य कालवा नागभिड तालुक्यातील येनोली माल गावाजवळ फुटल्याने शेतकऱ्याच्या पिकांत पाणी जात असल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवाय लाखो लिटर पाण्याची नासडी होत आहे.
आज (दि. १३) पहाटे नागभिड तालुक्यातील येनोली माल गावाजवळील कालवा फुटला. कालव्यातील सर्व पाणी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकात जात असल्याने पिकांची नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणावरून कालवा फुटला त्या ठिकाणी यापूर्वीच मोठे भगदाड पडले होते. मात्र कालव्याला पाणी सोडायचे असल्याने किरकोळ दुरूस्ती करण्यात आली. सिमेंटच्या पिशव्या त्या ठिकाणी लावून तलावातील पाणी कालव्याद्वारे शेतीला सोडण्यात आले. या दुरूस्तीकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याने कालवा फुटला असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
सध्या सर्वत्र पाऊस होत असल्याने घोडाझरी तलाव तुडुंब भरला आहे. परंतु शेतकऱ्यांच्या पिंकाना पाण्याची गरज असल्याने घोडाझरी तलावातील पाणी मुख्य कालव्याला सोडण्यात आले. कालव्याची डागडूजी व्यवस्थीत न केल्याने आज घोडाझरी सिंचन प्रकल्पाचा मुख्य कालवा नागभिड तालुक्यातील येनोली माल गावाजवळ पहाटेच्या सुमारास फुटला. कालव्यातील पाणी शेतात जात असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. दरवर्षी कालव्याला पाणी सोडण्यापूर्वी कालव्याची दुरूस्ती करणे आवश्यक असते. परंतु पाटबंधारे विभाग याकडे नेहमीच दुर्लक्ष करीत असते. त्यामुळे दरवर्षी कालवा कुठून ना कुठून फुटतो. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होते.
शेतपिकांचे मेाठ्या प्रमाणात नुकसान होते. तलावाचे पाणी सोडतेवेळी कालव्याची स्वच्छता केली जात नाही. कालवे व मुख्य वितरणीकामध्ये मोठ-मोठी झाडे तयार झाली आहेत. शिवाय गाळ,रेती, माती, कचरा साचला आहे. किरकोळ सफाई करून पाणी सोडण्यात येते. मुख्य कालव्याला ठिकठिकाणी मोठे मोठे भगदाड पडले आहेत. तलावाचे पाणी सोडण्यापूर्वी ते खड्उे बुजवितात. मात्र त्या ठिकाणावरून पुन्हा कालवा फुटतो. ब्रिटीश कालीन कालव्याची स्थिती खराब झाली आहे. पाटबंधारे विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. आज कालवा फुटला याकडेही घोडाझरी पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाल्याने कालवा फुटल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कालव्याच्या दुरूस्तीकडे सिंचन विभाग गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप येनोली माल ग्रामपंचायतचे सरपंच अमोल बावनकर यांनी केला आहे.