

चंद्रपूर : युरोपात लाल वाळलेल्या मिरचीला चांगलीच मागणी आहे. शिवाय भावही योग्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजूरा व कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांची वाळलेली लाल मिरची शुक्रवारी (दि.२१) युरोपात निर्यात करण्यात येणार आहे. युरोपियन मानकांत चंद्रपूर जिल्ह्यातील लाल मिरची फिट बसली आहे.
कोरपना आणि राजूरा तालुक्यात कापूस, सोयाबीन हे प्रमुख पिके आहेत. त्यासोबतच मिरचीचे उत्पादन घेतले जाते. परंतु पारंपारिक पद्धतीने घेण्यात येणाऱ्या मिरचीला फारसी मागणी नाही. भावही कमी मिळत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फारशी आर्थिक प्रगती साधता आली नाही. परंतु कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीने राजुरा व कोरपना तालुक्यातील मिरची उत्पादकांना आधुनिक पद्धतीने मिरची पिकाची लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना आर्थिक प्रगतीचा उपलब्ध करून दिला आहे. खास करून युरोपीयन मानकांनुसार मिरची पिकांचे उत्पादन घेण्याबाबत कंपनीने कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनात धडे दिले. त्यामुळे पहिल्यांदाच कोरपना तालुक्यात ८५० हेक्टर आणि राजुरा तालुक्यात ३०० एकरमध्ये मिरचीची लागवड करण्यात आली.
कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीच्या मार्गदर्शनात राजुरा तालुक्यात हानिकारक रसायनांचा वापर कमी करून अवशेष मुक्त (Residue-Free) मिरची उत्पादनाचा प्रायोगिक प्रयोग राबविण्यात आला.पहिल्याच वर्षी करण्यात आलेल्या प्रयोगात सहभागी झालेल्या ४ शेतकऱ्यांची मिरची युरोपियन बाजारपेठेतील कठोर गुणवत्तेच्या निकषांत बेंगलोर येथे करण्यात आलेल्या परीक्षणात उत्तीर्ण ठरली आहे. या प्रयत्नांचे फलित म्हणून स्वप्नील झुरमुरे, चंद्रकांत पिंपळकर आणि दिनकर डाहुले या तिघांच्या मिरची उत्पादनाने युरोपियन बाजारपेठेतील कठोर गुणवत्तेच्या निकषांत यशस्वीरित्या प्रवेश मिळवला आहे. लवकरच चंद्रपर जिल्ह्यातील लाल मिरची जागतिक बाजारपेठेत उपलब्ध होणार असून युरोपात विक्रीसाठी निर्यात केली जाणार आहे.
कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रयत्नामुळे जागतिक बाजारपेठेत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना व राजुरा तालुक्यातील मिरची उत्पादक पोहचला असल्याची दखल जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी घेतली आहे.