Chandrapur News | चंद्रपूर जिल्ह्यात धान कापणीच्या उंबरठ्यावर पावसाचे सावट

२७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान पुन्हा पावसाची शक्यता : शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली
Chandrapur News | चंद्रपूर जिल्ह्यात धान कापणीच्या उंबरठ्यावर पावसाचे सावट
Chandrapur News | चंद्रपूर जिल्ह्यात धान कापणीच्या उंबरठ्यावर पावसाचे सावट
Published on
Updated on

चंद्रपूर : धानाचे कोठार म्हणून ओळखला जाणारा चंद्रपूर जिल्हा पुन्हा एकदा हवामानाच्या अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकला आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीचा तडाखा सहन केलेल्या शेतकऱ्यांना आता ऐन कापणीच्या टप्प्यावर आलेल्या पावसामुळे पुन्हा धास्ती वाटू लागली आहे. शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) आणि शनिवारी (२५ ऑक्टोबर) जिल्ह्यातील काही तालुक्यांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडल्याने धान कापणीची गती मंदावली असून, शेतकरी पुन्हा चिंतेत आहेत.

धान पिकाची कापणी सुरू, पण हवामान आडवे येतेय

चंद्रपूर जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक तालुक्यातील भाग हा धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथे जड, मध्यम आणि हलक्या प्रतीचे धान पिकविले जाते. यावर्षीही खरीप हंगामात या तिन्ही प्रकारच्या धानाची लागवड करण्यात आली होती. सध्या हलक्या प्रतीचे धान कापणीसाठी तयार झाले असून काही ठिकाणी कापणीस प्रारंभ झाला आहे. मात्र, अचानक हवामान बदलल्याने आणि पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतकऱ्यांची कामे ठप्प झाली आहेत.

पावसाचा अंदाज आणि शेतकऱ्यांची वाढती चिंता

हवामान खात्याने २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे नुकतेच कापणीस तयार झालेले धान ओलाव्याने खराब होण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात घर करून आहे. "अरे हंगामात पावसाने हैराण केलं आणि आता कापणीच्या वेळी पुन्हा पाऊस आला तर हातात आलेलं पीकही जाईल," अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील धान, सोयाबीन आणि कापूस पिकाचे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी शेतकरी अजूनही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. काहींना मिळालेली मदत तुटपुंजी असल्याने नाराजी वाढली आहे. आता या नव्या पावसामुळे आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे मनोबल अधिक खचत आहे.

धान पिकावर पुन्हा संकटाचे सावट

जिल्ह्यातील नागभीड, ब्रह्मपुरी, मूल, सिंदेवाही, सावली, चिमूर, गोंडपिपरि आणि चंद्रपूर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी धान पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. हलक्या प्रतीचे धान आता कापणीच्या शेवटच्या टप्प्यात आलेले असताना, या अवेळी पावसाने शेतात उभे पीक तसेच कापलेले धान दोन्ही धोक्यात येऊ शकते. जर हवामानात सुधारणा झाली नाही, तर जिल्ह्यातील उत्पादनावर याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

२७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान पावसाची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील हवामान परिस्थिती पुढील काही दिवस निर्णायक ठरणार आहे. जर पाऊस सुरू राहिला तर धानाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  चंद्रपूर जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेचा कणा असलेले धान पीक पुन्हा एकदा हवामानाच्या कचाट्यात सापडले आहे. खरीप हंगामात झालेल्या नुकसानीनंतर आता कापणीच्या उंबरठ्यावर आलेले पीक संकटात सापडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news