

चंद्रपूर : बल्लारशाह–गोंदिया रेल्वेमार्गावर मंगळवारी वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने मन हेलावून टाकणाऱ्या आणि त्याचवेळी दिलासा देणाऱ्या दोन घटना घडल्या. पहाटे रेल्वेच्या धडकेत एका अस्वलीचा जागीच मृत्यू झाला, तर दुपारी त्याच मार्गावर रेल्वेच्या लोकोपायलटने प्रसंगावधान दाखवत आपत्कालीन ब्रेक लावल्याने रुळ ओलांडणाऱ्या वाघाचा जीव वाचला. काही तासांच्या अंतराने घडलेल्या या दोन घटनांनी वन्यजीव आणि रेल्वे यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.
चंद्रपूर प्रादेशिक वनपरिक्षेत्रांतर्गत बल्लारशाह–गोंदिया रेल्वेमार्गावरील अष्टभुजा रमाबाई नगरजवळील कक्ष क्रमांक ४०७ परिसरात ही घटना घडली. याबाबतची माहिती चंद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर यांनी दिली. पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास चांदा फोर्टच्या दिशेने येणाऱ्या रेल्वेची एका अस्वलीला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात अस्वलीचा जागीच मृत्यू झाला. बल्लारशाह–गोंदिया रेल्वेमार्गावर रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या अस्वलांची संख्या आता १४ वर पोहोचली आहे. त्यामुळे वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासकांनी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे.
याच दिवशी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास याच रेल्वेमार्गावर आशेचा किरण दाखवणारी घटना घडली. चांदा फोर्टकडे जाणाऱ्या रेल्वेच्या लोकोपायलटला अचानक रुळ ओलांडणारा वाघ दिसला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी प्रथम सतर्कतेचा हॉर्न वाजविला आणि त्यानंतर आपत्कालीन ब्रेक लावून रेल्वे थांबवली. त्यामुळे वाघाला सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने जाण्यास वेळ मिळाला. वाघ सुरक्षित दूर गेल्यानंतरच रेल्वे पुढे रवाना करण्यात आली. लोकोपायलटच्या प्रसंगावधानामुळे एका दुर्मिळ वन्यजीवाचा जीव वाचल्याने त्यांच्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या रेल्वेमार्गावर आतापर्यंत जवळपास १३० वन्यजीवांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे हा परिसर अतिसंवेदनशील वन्यजीव भ्रमणमार्ग असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. तेलंगणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांना जोडणारा हा महत्त्वाचा वन्यजीव कॉरिडॉर असल्याने येथे वन्यजीवांची सातत्याने वर्दळ असते. हॅबिटॅट कंझर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे यांनी, "आतापर्यंत १४ अस्वलांसह शेकडो वन्यजीवांचा बळी गेला आहे. आणखी किती वन्यजीवांचा जीव गेल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि संबंधित यंत्रणा प्रभावी उपशमन योजना राबविणार?" असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
घटनास्थळी हॅबिटॅट कंझर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे, रणजित मडावी, अनिकेत वनकर, गणेश मेश्राम यांच्यासह चंद्रपूर प्रादेशिक वनपरिक्षेत्राचे श्री. किटे, वनविकास महामंडळाचे श्री. मेश्राम आणि वनपाल कांबळे उपस्थित होते. एकाच दिवशी काही तासांच्या अंतराने घडलेल्या या दोन घटना अनेक प्रश्न उपस्थित करून गेल्या. एका निष्पाप अस्वलीचा जीव रेल्वेखाली गेला, तर दुसरीकडे एका जागरूक लोकोपायलटच्या संवेदनशीलतेमुळे वाघाला नवजीवन मिळाले आहे.