

Nagbhid Tehsildar Farmer March
चंद्रपूर : धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १७ सप्टेंबर रोजी नागभीड तहसील कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून मोर्चात तालुक्यातील गावागावांतून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत. ‘धान बोनस आमचा हक्क’ या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे.
१७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता साई मंदिर देवस्थान येथून मोर्चाला सुरुवात होणार असून, मोर्चा नागभीड तहसील कार्यालयावर धडकणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर शेतीमालाला योग्य मोबदला, धान बोनस तसेच इतर प्रलंबित प्रश्नांवर शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नागभीड तालुक्यातील गावागावांत जनजागृती करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने शेतकरी नागभीडकडे रवाना होणार असून, हा मोर्चा संपूर्ण शेतकरी समाजाच्या प्रश्नांचा आवाज असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांनी एकजुटीने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकरी प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणारे शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे हे या मोर्च्यात सहभागी होणार असून त्यांच्या नेतृत्वाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या आंदोलनात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तुकाराम निकुरे, उपाध्यक्ष रमेशजी बोरकर, सचिव धनंजय बोरकर, विनोद बोरकर, संजय गहाणे, कुष्णा गंजेवार, गिरीष नवघडे, दिवाकर कामडी, अतुल सिद्धमशेट्टीवार, आतिष भाकरे, भुपेश भाकरे, विलास घोनमोडे यांच्यासह तालुक्यातील असंख्य शेतकरी सहभागी होणार आहेत.
धान बोनससह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नागभीडमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून, ‘धान बोनस आमचा हक्क—तो मिळालाच पाहिजे!’ या मागणीसह शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.