

Arun Lakhani Elected Unopposed
चंद्रपूर : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अरुण लखानी हे अविरोध निवडून आले असून त्यांनी आज (दि.१०) जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारले. काँग्रेस आघाडीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर या निवडणुकीतील चुरस आधीच संपुष्टात आली होती आणि लाखानी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला होता.
वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणूक यंदा सुरुवातीपासूनच चर्चेत होती. महायुतीकडून अरुण लखानी तर महाविकास आघाडीकडून शैलेश अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली होती. दोन्ही पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच अग्रवाल यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने प्रत्यक्ष मतदानाची वेळच आली नाही आणि लाखानी यांची अविरोध निवड निश्चित झाली.
विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर अरुण लाखानी यांनी माध्यमांशी संवाद साधताना मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित विविध प्रश्नांचा अभ्यास आपण गेल्या अनेक वर्षांपासून करत असल्याचे त्यांनी नमूद केले. या अनुभवाच्या बळावर विधान परिषदेत मतदारसंघातील तसेच विदर्भातील महत्त्वाचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
"माझा अभ्यास असलेल्या विषयांना मी विधान परिषदेत उपस्थित करून ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहीन. स्थानिक स्वराज्य संस्थांना भेडसावणाऱ्या समस्या, ग्रामीण व शहरी विकासाशी संबंधित प्रश्न तसेच जनहिताचे मुद्दे सभागृहात प्रभावीपणे मांडण्यास प्राधान्य देणार आहे," अशी प्रतिक्रिया लाखानी यांनी यावेळी दिली.
यावेळी महायुतीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर समर्थकांनी आनंदोत्सव साजरा करत लखानी यांचे अभिनंदन केले. त्यांच्या अविरोध निवडीमुळे महायुतीला या मतदारसंघात मोठे यश मिळाले असून आगामी काळात विधान परिषदेत ते वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या प्रश्नांना कितपत न्याय देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.