

Raipur farmer death
चंद्रपूर : विद्युत खांबावरील तार तुटून शेताच्या तारेच्या कुंपणावर पडल्याने विद्युत शॉक लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू तर तिघे जण जखमी झाले. ही घटना कोरपना तालुक्यातील रायपूर शेतशिवारात मंगळवारी (दि.२) सकाळच्या सुमारास घडली. तुकाराम रामचंद्र आत्राम (वय ५५, रा. रायपूर) असे मृताचे नाव आहे. तर जखमीमध्ये गीता अनिल आत्राम (वय ४७) , प्रकाश रामचंद्र आत्राम (वय ४५) , अशोक आत्राम (वय ४७, रा. रायपूर) यांचा समावेश आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्याने विद्युत खांबाच्या प्रवाहीत तारा शेताला लावलेल्या तारेच्या कंपाऊडवर तुटून पडल्या. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी शेतात काम करण्यासाठी गेले असता कपांऊडच्या तारेला स्पर्श झाल्याने तुकाराम आत्राम यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले गीता अनिल आत्राम (वय ४७) , प्रकाश रामचंद्र आत्राम (वय ४५) , अशोक आत्राम (वय ४७) यांचाही तारेला स्पर्श झाला. मात्र समयसुचकता दाखवित लगतच्या काही नागरिकांनी त्यांना बांबूच्या साह्याने विद्युत तारेपासून अलग केल्याने त्यांचे जीव वाचले. मात्र ते तिघे जखमी झाले.
या घटेनेची माहिती कोरपना पोलिस स्टेशनला देण्यात आली. काही वेळात कोरपना पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरीता ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे पाठविण्यात आला. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या तिघांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती खासदार प्रतिभा धानोरकर , माजी आमदार सुभाष धोटे , माजी आमदार वामनराव चटप यांना होताच त्यांनी मृतांच्या परिवारांची भेट घेऊन सांत्वन केले. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकन करत आहेत.