

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील शिवनपायली येथे आज बुधवारी ( 1 जानेवारी 2024) ला सकाळी अकरा वाजता सुमारास समूहाने उडत जात असलेल्या मधमाशांनी अचानक घरासमोर रस्त्यावर बांधलेल्या बकऱ्यांवर हल्ला चढविला. यात तीन बकऱ्या दुपारी चार वाजता ठार झाल्या तर दहा ते पंधरा बकऱ्या गंभीर जखमी आहेत. एक महिला आणि दोन पुरुषांवर हल्ला केल्याने ते जखमी झाले. त्यांनी वेळीच घरात शिरून मधमाश्यापासून आपला जीव वाचविला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील शिवनपायली येथील विनायक रामचंद्र नागोसे याचे घरासमोर बकऱ्या बांधल्या होत्या. आज बुधवारी सकाळी अकरा वाजता सुमारास समूहाने जात असलेल्या मधमाशांनी, त्या बकऱ्यावर हल्ला चढविला. मधमाश्या प्रचंड चावा घेत असल्याने बकऱ्यांनी प्रचंड हंबरडा फोडला. यावेळी घरी असलेले मालक विनायक नागोसे यांच्या हा प्रकार लक्षात आला.
त्यांनी बांधून असलेल्या बकऱ्यांना सोडण्याचा प्रयत्न केला. असता मधमाश्यांनी त्यांच्यावर सुद्धा हल्ला चढविला. यामुळे बकऱ्यांना तसेच ठेवून आपला जीव वाचविण्यासाठी त्यांनी समोरच्या घरी आश्रय घेतला. एक महिला एक पुरुष याच घरासमोरून जात असताना त्याच्यावर सुद्धा हल्ला केला. त्यांनी आपला जीव वाचविण्यासाठी बाजूच्या घरी जाऊन आश्रय घेत दरवाजे बंद केले. या हल्ल्यामध्ये तीन बकऱ्या ठार झाल्या आहेत तर 15 बकऱ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. बकरी मालक गरीब असून बकरी पालन व्यवसायावर त्याच्या कुटुंबाची उपजीविका चालते. प्रशासनाने बकरी मालक नागोसे याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.