Chandrapur Bail Pola | बैल पोळ्यातून बळीराजाची आर्त हाक; ‘सर्जा राजा’च्या पाठीवरून शेतकऱ्यांच्या व्यथा शासनाच्या दारी

कोरडा दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्जमाफी द्या, धानाला बोनस द्या
Bail Pola Festival
Bail Pola FestivalPudhari
Published on
Updated on

Chandrapur Kharif Crops In Danger

चंद्रपूर : बळीराजाचा जिव्हाळ्याचा सण असलेल्या बैलपोळ्यावर यंदा दुष्काळाचे सावट स्पष्टपणे जाणवत आहे. सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपूनही चंद्रपूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिके संकटात सापडली असून सोयाबीन, कापूस करपण्यास सुरुवात झाली आहे, तर अनेक भागांतील धानपिकेही सुकू लागली आहेत. या भीषण परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला.

बैलपोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आपल्या ‘सर्जा राजा’च्या पाठीवरच सरकारकडे  मागण्या लिहून बळीराजाची व्यथा मांडली. ‘कोरडा दुष्काळ जाहीर करा’, ‘सरसकट कर्जमाफी करा’, ‘धानाला बोनस द्या’, ‘स्वामीनाथन आयोग लागू करा’ अशा मागण्या बैलांच्या पाठीवर लिहिण्यात आल्या. काही ठिकाणी ‘सरकारने माझ्या मालकाला संपूर्ण कर्जमाफी द्यावी’ तसेच ‘देवा, माझ्या मालकावर का कोपलास?’ असा सवालही बैलांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला.

Bail Pola Festival
Chandrapur Water Crisis | पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य; गडचांदूर नगरपरिषदेचा मोठा निर्णय

पावसाच्या प्रतीक्षेत पिके करपली

यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रोवणीच्या काळातही पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांना कसेबसे पिकांची लागवड करावी लागली. त्यानंतर काही प्रमाणात पाऊस झाल्याने पिके उभी राहिली; मात्र आता पुन्हा पावसाने मोठी दडी मारली आहे. महिनाभरापासून पावसाचा मोठा खंड पडल्याने जमिनीतील ओलावा कमी होत चालला आहे.

सोयाबीन आणि कापूस पिकांची स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. पिके करपण्यास सुरुवात झाली असून आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास ही पिके वाचविणे शेतकऱ्यांसाठी कठीण होणार आहे. धान उत्पादक भागातही परिस्थिती गंभीर असून पाण्याअभावी धानपिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.

Bail Pola Festival
Chandrapur Crime | राजुरातील भरदिवसा गोळीबार प्रकरणात सराईत गुन्हेगारांवर ‘मोक्का’

मोठा खर्च, मात्र उत्पन्नाची शाश्वती नाही

खरीप हंगामासाठी बियाणे, खते, औषध फवारणी, मजुरी आणि मशागतीवर मोठ्या प्रमाणात खर्च केल्यानंतरही पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता उत्पादन हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने केवळ परिस्थितीचा आढावा न घेता तातडीने ठोस मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

बैलपोळ्यातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न

बैलपोळा हा केवळ बैलांची पूजा करण्याचा सण नसून शेतकरी आणि त्याच्या सर्जा राजामधील अतूट नात्याचा उत्सव आहे. वर्षभर शेतकऱ्याच्या कष्टात खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी सजवून त्याची पूजा केली जाते. याच सणाचा आधार घेत यंदा शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.

बैलांच्या पाठीवर लिहिलेल्या मागण्या म्हणजे बळीराजाच्या मनातील आक्रोशच असल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले. उत्सवाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा हा अनोखा प्रयत्न असून, या संदेशाची शासनदरबारी दखल घेतली जाणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Bail Pola Festival
Chandrapur News : वर्धा नदीच्या पुलावरून युवकाची उडी; शोधमोहीम सुरू

अर्ध्या जिल्ह्यात धान, तर उर्वरित भागात कापूस-सोयाबीनचे संकट

चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धानाचे पीक घेतले जाते, तर उर्वरित भागात सोयाबीन, कापूस तसेच विविध बागायती पिकांची लागवड केली जाते. पावसाच्या लांबलेल्या खंडाचा फटका या सर्वच पिकांना बसत आहे. त्यामुळे धान उत्पादक असो किंवा कापूस-सोयाबीन उत्पादक, जिल्ह्यातील शेतकरी सध्या संकटाच्या छायेत आहे.

आता सरकारच्या निर्णयाकडे नजरा

एकीकडे बैलपोळ्याचा उत्साह आणि दुसरीकडे पिके वाचविण्यासाठी आभाळाकडे लागलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा, असे विरोधाभासी चित्र यंदा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. कोरडा दुष्काळ जाहीर करणे, सरसकट कर्जमाफी, धानाला बोनस आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, अशा मागण्या बैलपोळ्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत.

बैलांच्या पाठीवर लिहिलेला हा संदेश आता सरकारच्या कानी पोहोचतो का आणि बळीराजाच्या संकटाची शासनाकडून किती गांभीर्याने दखल घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पावसाची आणखी प्रतीक्षा करण्यापेक्षा शासनाने तातडीने परिस्थितीचे पंचनामे, पिकांचे नुकसान मूल्यांकन आणि शेतकऱ्यांसाठी भरीव मदतीची घोषणा करावी, अशी अपेक्षा संकटग्रस्त शेतकरी व्यक्त करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news