

Brahmapuri symbolic protest
चंद्रपूर: जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती ब्रह्मपुरीच्या वतीने आज (दि. २५) रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात पत्रकार, वकील, शिक्षक,योजना कर्मचारी, शेतकरी, युवक यांच्यासह बहुजन समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जनसुरक्षा विधेयक हा कायदा जनतेच्या सुरक्षेसाठी नसून सत्ताधाऱ्यांच्या हितासाठी असल्याचा आरोप जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीने केला.
या कायद्यामुळे सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अर्बन नक्षली ठरवण्याचा धोका निर्माण झाला आहे. या संज्ञेची कोणतीही स्पष्ट व्याख्या विधेयकात नसल्याने शिक्षकांनी मागणी केली, वकिलांनी मत मांडले, पत्रकारांनी सत्य लिहिले, शेतकऱ्यांनी व कामगारांनी मोर्चा काढला तर त्यांनाही देशद्रोही ठरवले जाऊ शकते. त्यामुळे हा कायदा लोकशाहीला संपवणारा, भीतीदायक आणि जनविरोधी असल्याची तीव्र प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रेमलाल मेश्राम, विनोद झोडगे, लिलाधर वंजारी, जगदिश पिलारे,संतोष रामटेके, जिवन बागडे, मिलिंद रंगारी, सुधाकर पोपटे, संजय वाळके, डॉ महेश कोपुलवार, स्वप्निल राऊत, राजेश माटे, प्रभू लोखंडे, डी एम रामटेके, डेविड शेंडे, हरिश्चंद्र चोले, आर बी मेश्राम, वर्षा घुमे,प्रतिभा डांगे यांसारख्या समाजभान असलेल्या नेत्यांनी मार्गदर्शन करताना जनतेला एकत्र येण्याचे आवाहन केले. यानंतर विधेयकाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली आणि “असा कसा हटत नाही, हटल्याशिवाय राहत नाही!”,“जनसुरक्षा नव्हे, जनविरोधी कायदा!”, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत मा.राज्यपाल यांना निवेदन सादर करण्यात आले. तसेच येत्या ८ ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मारक ते तहसील कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, सर्व सामाजिक संघटनांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा विधेयक रद्द झाल्याशिवाय शांत बसणार नाही, हा निर्धार आंदोलनात दिसून आला.