चंद्रपूरात पारा चढलाय, उष्माघाताचा धोका वाढलाय! नागरीकांना खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनचे आवाहन
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढत असून तापमानाचा परा चढला आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
काल शुक्रवार पासूनच चंद्रपुरातील तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांसाठी उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरीकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घराबाहेर बराच वेळ घालवून शरीरातून घामाच्या धारा निघत असतील तर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शरीराला पुरेसे पाणी न मिळाल्यास उष्णता जीवघेणी ठरु असा इशारा देत,जेव्हा शरीराचे तापमान घोकादायक पातळीपर्यंत वाढते आणि शरीराची शीतकरण यंत्रणा योग्यरित्या कार्य करण्यास अपयशी ठरते तेव्हा धोका ठरू शकतो.
उष्माघाताच्या लक्षणांमध्ये शरीराचे उच्च तापमान, अनेकदा १०४°F (४०°C) पेक्षा जास्त असते. यामुळे गोंधळ, चक्कर येणे आणि मळमळ होऊ शकते. नाडीचे ठोके वाढणे आणि डोकेदुखी ही देखील सामान्य लक्षणे आहेत. त्वचा उष्ण आणि कोरडी किंवा ओलसर आणि घाम वाटू शकते. गंभीर प्रकरणांमध्ये बेशुद्ध पडणे किंवा झटके येऊ शकतात. स्वतःला किंवा इतर कोणाला ही लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहणे टाळावे. टोपी तसेच हलक्या रंगाचे कपडे वापरावे. भरपूर पाणी प्यावे, सोबतच ओआरएसचा वापर करावा. पाणीयुक्त फळे खावीत. उन्हाळ्यात कॅफिनयुक्त पेये तथा अल्कोहोल पिणे टाळावे. नागरीकांनी सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे असून वृद्ध, लहान मुले तसेच पूर्व- अस्तित्वात असलेली वैद्यकीय परिस्थिती ज्यांची चांगली नाही त्यांनी अतिरिक्त काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काय उपाय करावे
पुरेसे पाणी प्या, शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखावी. घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. थेट येणाऱ्या सुर्यप्रकाशाला, उन्हाला अडविण्याकरिता घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टिव्ही, किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
काय करु नये
उन्हात अतिकष्टाची कामे करु नये. दारु, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नये. दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये. लहान मुले किवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्या. चप्पल न घालता अनवाणी उन्हात चालू नये.
उष्माघाताला बचाव करण्यासाठी आरोग्य विभाग अलर्ट
उष्माघात ही एक गंभीर स्थिती आहे,मात्र ती साध्या उपायांनी टाळता येते. लक्षणे आढळल्यास ताबडतोब वैद्यकिय मदत घेणे गरजेचे आहे. याकरिता जिल्ह्यातील सर्व ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमीक आरोग्य केंद्र तसेच शासकिय वैद्यकिय महाविद्यालयामध्ये कोल्ड वार्ड कार्यान्वित करण्यात आलेले आहे. आवश्यकता पडल्यास मोफत संदर्भसेवा सुध्दा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. नागरीकांच्या सुविधेकरिता, शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर ०७१७२- २५२१०३ तसेच हेल्पलाईन क्रमांक १०७७, ११२, १०२, १०४, १०८ टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधता येऊ शकतो. उन्हाळ्यात योग्य ती काळजी घेण्याचे तसेच लक्षणे आढळल्यास ताबडतोब रुग्णालयात जाऊन उपचार करण्याचे तसेच उष्माघाताचा त्रास झाल्यास संबंधित व्यक्तीला ताबडतोब थंड ठिकाणी हलवावे. शरीराच्या जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यावर थंड पाण्याचा मारा करावा. शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.