चंद्रपूर : वरोरा, भद्रावती तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट

चंद्रपूर : वरोरा, भद्रावती तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा :  चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा आणि भद्रावती तालुक्यात शनिवारी सायंकाळी बहुतांश भागात मुसळधार अवकाळी पावसासह गारपीट झाली. मेघगर्जनेसह १५ ते २० मिनटे बोर ते लिंबा एवढी गारपीट झाल्याने शेतातील रब्बी पिकांचे गहू, चना, ज्वारी रब्बी पिके जमीनदोस्त झाली तर बागायती पिकामध्ये मिरची व अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले. वरोरा येथे तब्बल 15 तास वीज पुरवठा खंडित झाला.

हवामान खात्याने शनिवारी तसेच 11 व 12 फेब्रुवारी ला चंद्रपूर जिल्ह्यात येलो अलर्ट घोषीत केला होता. काल शनिवारी दुपारपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होवुन सांयकाळी सात वाजताच्या सुमारास वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील विविध भागात अचानकपणे मेघ गर्जनेसह अवकाळी पावसासह गारपीटाला सुरुवात झाली. वरोरा येथे तब्बल 20 मिनीटे गारपीट झाली. गारपीटाचा मारा जबरदस्त असल्याने शेतात उभे असलेले रब्बी हंगामातील हरभरा, गहू, चना, ज्वारी पिके जमीनदोस्त झाली. फळबागांची तसेच खरीप हंगामातील उभ्या असलेल्या तूरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती हाती आली आहे.

त्यानंतर भद्रावती तालुक्यात अर्धा तास अवकाळीने पावसासह गारपिटीने झोडपून काढले. यामध्येही रब्बी व बागायती तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी पीक काही दिवसात हातात येणार असतानाच अवकाळीसह गारपीट झाल्याने पिके जमिनदोस्त झाली आहेत.

१५ मिनटांचा पाऊस; १५ तास वीजपुरवठा खंडित

वरोरा तालुक्यात काल शनिवारी सांयकाळी सात वाजताच्या सुमारास अचानकपणे अवकाळी पावसाचा तडाखा बसला. गारपीटासह जोरदार पाऊस बरसताच वरोरा शहराला व वीज वितरण कंपनी  लागून असलेल्या बोर्डा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. पाऊस थांबल्यावर वीजपुरवठा पूर्ववत सुरू होईल अशी आशा असताना कित्येक तास वीजपुरवठा सुरळीत चालू झाला नाही. येथील नागरिक रात्रभर अंधारातच होते. जवळपास १५ तासांच्या प्रतिक्षेनंतर आज सकाळी सव्वा नऊ वाजताच्या सुमारास वीजपुरवठा सुरू झाला. केवळ १५ मिनटांच्या पावसात जर १५ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने रात्रभर नागरीकांना त्रास सहन करावा लागला.

 चंद्रपूर जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी येलो अलर्ट

चंद्रपूर जिल्ह्यात काल शनिवारी अवकाळीसह पावसासह गारपीटीने झोडपून काढल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने आज आज रविवारी व सोमवारी येलो अलर्ट घोषीत केला आहे. आज दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी सरी कोसळल्या. आज जिल्ह्यात एक दोन ठिकाणी गारपीटिसह पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर सोमवारीही येलो अलर्ट आहे. तिन दिवसाच्या बदललेल्या हवामानामुळे रब्बी पिके हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल शनिवारी गारपीटीसह अवकाळी पाऊस कोसळला. आज ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी आल्या. उद्या पुन्हा येल्लो अलर्ट असल्यानं शेतकरी संकटात सापडले आहे. यावेळी खरिपातील मुख्य पीक धान हो अवकाळी पावसात सापडला आणि आता रब्बी पिके. त्यामुळे मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news