चंद्रपूर : वैनगंगा नदी पुलावरील खड्ड्यामुळे दुचाकीचा अपघात; तरुण वाहून गेला | पुढारी

चंद्रपूर : वैनगंगा नदी पुलावरील खड्ड्यामुळे दुचाकीचा अपघात; तरुण वाहून गेला

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : अहेरी चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर पडलेले खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीवरील बापलेक नदीत पडले. या घटनेत मुलगा वाहून गेल्याची घटना आज (दि. ८) घडली.

अहेरी-चंद्रपूर हा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गावर दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ सुरू असते. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील लोह प्रकल्पातून लोह खनिजांच्या कच्चा मालाची जड वाहतक या मार्गानेच सुरू आहे. जड वाहतुकीमुळे रस्त्यासह नदी पुलावर अगणित खड्डे पडले असून खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा कळायला मार्ग नाही. खड्यामुळे यापूर्वी अनेक अपघात घडले. त्यात अनेकांना जीवास मुकावे लागले तर काहींना अपंगत्व आले आहे. आज (८ ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास गोंडपिपरी तालुक्याच्या ठिकाणवरून स्व:ताचे कुनघाडा गावी दुचाकीने बापलेकासह तिघे जण येत होते. आष्टी जवळील वैनगंगा नदीपुलावर पडलेले खड्डे चुकीविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने दुचाकीवरील बापलेक नदीपात्रात पडले. अन्य एक पुलावर पडला. यामध्ये मुलगा किशोर गणपती वासेकर नदीपात्रातील पाण्यात वाहून गेला. तर वडिल गणपती येराजी वासेकर यास नदीतून सुखरूप वाचविण्यात यश आले. त्यांना बाहेर काढण्यात यश आले. पुलावर पडलेला शुभम बोलगडवार हा सुखरूप आहे. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या सिमेवरील आष्टि जवळील वैनगंगा नदीवरील पूल जीर्ण झाला आहे. जड वाहतुकीमुळे पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. घटनेची माहिती होताच आष्टि- गोंडपीपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र नदीमध्ये पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मुलगा वाहून गेल्याची माहिती त्यांनी दिली.

Back to top button