चंद्रपूर
चंद्रपूरात गांधी जयंती दिनी इरई बचाव सत्याग्रह
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : आज (दि. 2 ऑक्टोबर) रोजी गांधी जयंती निमित्त इरई नदीचे खोलीकरण व स्वच्छतेच्या मागणीसाठी चंद्रपूरातील नागरिकांनी जल सत्याग्रह केला. भजन दिंडी काढून तसेच गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून व इरईच्या पात्रात घोषणा देऊन सत्याग्रह करण्यात आला. 17 वर्षांपासून हा चंद्रपूरात हा संघर्ष सुरू आहे.
इरई बचाव जनआंदोलनाचे जनक व वृक्षाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कुशाबराव कायरकर, जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या उपस्थितीत दाताळा रोडवरील अग्रसेन भवन समोरून भजन दिंडीला दुपारी 12 वाजता सुरुवात झाली. भूमी कायरकर यांनी दिंडीचे नेतृत्व केले तर जय देशमुख या लहान मुलाने गांधींची वेशभूषा केली. इरई नदीच्या पात्रात दिंडी पोहोचल्यानंतर दिंडीत सहभागींनी नदीपात्राच्या एका भागात स्वच्छता मोहीम राबविली. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या प्रतिमेचे पूजन करून नदीमध्ये जल सत्याग्रह करण्यात आला. नंतर आंदोलनात सहभागी नागरिकांनी इरईचे खोलीकरण व स्वच्छतेच्या मागणीसाठी घोषणाबाजी केल्या.
22 मार्च 2006 रोजी जलदिनानिमित्त इरई नदीच्या पात्रात सत्याग्रह करून इरई बचाव जन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली होती. या आंदोलनाला 17 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलेला आहे.या 17 वर्षात अनेक वेळा स्थानिक नेत्यांनी इरईचे खोलीकरण व स्वच्छतेची आश्वासने दिली. कधी कधी तर खोलीकरणाला थातूर मधून सुरुवात सुद्धा करण्यात आली. परंतु संपूर्ण इरई पात्राचे खोलीकरण करण्याचे आश्वासनाची पूर्तता करण्यास लोकप्रतिनिधीं आणि जिल्हा प्रशासनाला अपयश आले आहे.दुसरीकडे इरई बचाव जन आंदोलनाने आपल्या संघर्षाचे 17 वर्षे पूर्ण करून अठराव्या वर्षात पदार्पण केले. जनविकास सेनेचे मनीषा बोबडे व अक्षय येरगुडे निखाडे,प्रतिभा कायरकर,संगिता विधाते,विद्या ठोंबरे,वंदना मोरे,नलिनी कडुकर,वर्षा काळभुत,शिवसेना(उबाठा)च्या कुसुम उध्दार,निलीमा शिरे,अर्चना चामटकर,दिक्षा सातपुते,सुनंदा जोगी,मेघा दखने,सचिन निंबाळकर,महेश काहीलकर,अमूल रामटेके,विठ्ठल भगत,तुकाराम झाडें,सुरेश विधाते,पांडुरंग गावतुरे, अविनाश देव,देवराव बोढे, सुधाकर मत्ते,नगमा पठाण, सुरेश खाडे आप च्या तबसूम,योगेश कुरेकर, नागरिक सत्याग्रहात सहभागी झाले होते.
महाऔष्णिक विज निर्मिती केंद्राच्या राखेमुळे इरईचे पात्र उथळ झाले. त्यामुळे पुराचा धोका वाढला.अनेक घरे निळ्या पुररेषेच्या आतमध्ये आली. एकीकडे नागरिकांना दरवर्षी पुराचा फटका बसतो, परावर्तित भूखंड असुनही बांधकामाची परवानगी नाकारण्यात येत आहे. तर दुसरीकडे स्थानिक नेते केवळ पोकळ आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करीत असल्याच आरोप जनविकास सेनेने केला आहे.

