मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूरात उपोषणस्थळी येवून टोंगेंचे उपोषण सोडवावे; वड्डेटीवार यांची मागणी | पुढारी

मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूरात उपोषणस्थळी येवून टोंगेंचे उपोषण सोडवावे; वड्डेटीवार यांची मागणी

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे ओबीसींच्या न्याय मागण्यांसाठी चंद्रपूरात आठवडाभरापासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरविली असून हे ओबीसी समाजाचे दुर्दैव आहे. मुख्यमंत्र्यांना काश्मीर पर्यटनाला जाण्यासाठी वेळ आहे, मात्र ओबीसी समाजाच्या टोंगेंचे उपोषण सोडविण्यासाठी वेळ नाही अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूरात उपोषणस्थळी येवून टोंगेंचे उपोषण सोडवावे, अशी मागणी वडेट्टीवार यांचेसह भाजपचे नेते आशिष देखमुख व आमदार परिणय फुके यांनी केली.

टोंगे यांच्या उपोषणाला आज (दि. १७ रविवारी) विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह भाजप नेते आशिष देशमुख, परिणय फुके या नेत्यांनी भेट देऊन उपोषण सोडविण्याची मागणी केली. मागण्या पूर्ण होत नाही तोवर उपोषण सोडण्याचा प्रश्नच येत नाही असे टोंगे यांनी नेत्यांना सांगितले. यावेळी वडेट्टीवार यांनी राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. १९ सप्टेंबर रोजी संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या धर्तीवर जातनिहाय गणना केली जाईल, असे जाहीर करावे अशी मागणी केली. वडेट्टीवार म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना जातनिहाय गणना करण्याचा ठराव केला होता. आता राज्य सरकारला केवळ अंमलबजावणी करायची आहे, मात्र ती सुद्धा केली जात नाही. ओबीसी वसतिगृहाच्या संदर्भातही निर्णय घेतला गेला नाही. ओबीसींना घरकुल मिळत नाही. ५२ टक्के ओबीसींना राज्याच्या तिजोरीतून एक हजार कोटी रुपये काढून घरे देण्याची मागणी केली होती. मात्र सरकारने ती पूर्ण केली नाही. मराठ्यांना आमचा वाटा देऊ नका, त्यांचा वाटा त्यांना देण्यात यावा, आरक्षणाची टक्केवारी वाढवावी असेही ते वड्डेटीवारांनी मागणी केली.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ओबीसींना ५० टक्के शिष्यवृत्ती सुरू केली. मात्र आता शंभर टक्के शिष्यवृत्ती ओबीसींना मिळत नाही. ८० टक्के मराठा समाजाच्या हातात साखर कारखाने, शिक्षणसंस्था व उद्योग आहे. तरी मराठा समाजाची स्थिती वाईट आहे, २० टक्के ओबीसी व इतर समाजाच्या हातात आहे, तेव्हा ओबीसी समाजाची स्थिती किती वाईट असेल याचा विचार सरकारने करावा. ओबीसी अजूनही झाडाच्या पालाखाली घर करून वास्तव्य करित आहेत. मराठा समाजाचे आंदोलन मुख्यमंत्र्यांनी सोडविले, आम्ही त्याचे स्वागत करतो. सात दिवस झाले ओबीसी समाजाचा तरुण चंद्रपूरात उपोषण करीत आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी टोंगे यांचे उपोषण सोडवावे. मुख्यमंत्र्यांना चर्चेतून मार्ग काढावा. ओबीसी आरक्षणात मराठ्यांना वाटा देणार नाही या उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भूमिकेचे स्वागत करतो, असेही वडेट्टीवार म्हणाले. उपोषण सोडविले नाही तर ओबीसींच्या रोषाला बळी पडावे लागेल, असाही इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

भाजप नेते आशिष देशमुख आमदार परिणय फुके यांनीही उपोषण मंडपाला भेट दिली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ चंद्रपूर येथे येऊन टोंगे यांचे उपोषण सोडवावे, अशी विनंती केली.

Back to top button