चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : राजुरा तालुक्यातील चार्ली गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. या दारू विक्रीचा महिलांना त्रास सहन करावा लागत असून कुटूंबिय दारूच्या आहारी जात आहे. भाविपिढी बरबाद होण्याच्या मार्गावर असल्याने आज सोमवारी (दि. २७) महिलांनी थेट चंद्रपूरात येऊन पोलिस कार्यालयाला धडक दिली. दारू विक्री करणाऱ्या विरोधात कारवाईची मागणी लावून धरली. पोलीस अधिक्षकांनी थेट दूरध्वनी वरून राजूरा पोलिसांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्याने महिलांचा रोष शांत झाला.
राजुरा तालुक्यातील चार्ली येथे स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने गेल्या 10 वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू आहे. गावातील महिलांनी अनेकवेळा याबाबत आवाज उठवला, परंतु स्थानिक पोलिसांशी मिलीभगत असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांवर आजपर्यंत कारवाई करण्यात आली नाही. गावात 24 तास दारू उपलब्ध असल्याने शेतकरी, शेतमजूर, युवक आणि बालके व्यसनाचे आहारी जात आहे. गावात भांडणे वाढली असून कौटुंबिक कलह देखील वाढले आहेत. गावातील शांतता धोक्यात आली असून महिला वर्ग चिंतेत आहे. कुणाचा पती, कुणाचा मुलगा, कुणाचे वडील दारुचे सेवनामुळे कुटुंबाचे नुकसान करत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त महिलांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घेऊन आपली कैफियत मांडली. चार्लीच नव्हे या भागातील अनेक गावांत अवैध दारू विक्रीने महिला त्रस्त आहेत. या दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कार्यवाहीचे आवाहन त्यांनी यावेळी पोलीस अधीक्षक यांचेशी संवाद साधताना केले. तसेच ग्रामपंचायतीने याविरोधात घेतलेला ठराव व सह्यांचे निवेदन सुपूर्द केले.याप्रसंगी उमाकांत धांडे यांनी पोलिस अधीक्षक रविंद्र सिंग परदेशी यांची या महिलांशी भेट घडवून आणली. याप्रसंगी सरपंच सुरेंद्र आवारी, संबा माहुरे, माजी सरपंच गंगाधर कुचनकर, किशोर ढूमने, विजय निवलकर, अनिल तुरानकर,कल्पना माहुरे, इंदिरा शेंडे, शकुंतला महाकुलकर,मंगला सोनटक्के,लता तुमाने,मनीषा घाटे यांचेसह गावातील महिलांनी उपस्थिती होती. यावेळी पोलीस अधीक्षक यांनी संबंधित पोलिस स्टेशनचे अधिकाऱ्यांना फोन करून ताबडतोब कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.