![लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दोन गटात हाणामारी, एकाचा खून; पाच आरोपींना अटक](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F08%2F%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : लग्नाच्या रिसेप्शनमध्ये डीजेवर नाचण्यावरून झालेल्या भांडणानंतर दोन गटात तुफान हाणामारी झाली. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या युवकाचा खून झाला असून या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर शहर खुनाच्या घटनेमुळे हादरून गेले आहे. किशोर पिंपळकर असे मृत्ताचे नाव असून तो भद्रावरी तालुक्यातील तीरवंजा येथील रहिवासी होता.
चंद्रपूर महानगरातील राम सेतू जवळील लॉन मध्ये बाबूपेठ येथील संदीप पिंपळकर यांच्या लग्नाचे रिसेप्शन १५ जून सायंकाळीं होते. रिसेप्शनमध्ये डीजे लावण्यात आला होता. डीजेच्या तालावर नाचताना बाबूपेठ येथील युवकांचा तिरवंजा गावातील युवकांसोबत भांडण झाले. भांडणाचे रुपांतर दोन गटातील युवकांमध्ये हाणामारी मध्ये झाले.
रिसेप्शन आटोपल्यानंतर भद्रावती तालुक्यांतील तिरवंजा येथील ५ ते ६ जण गावाकडे परत जात असताना बापूपेठ येथील युवकांनी त्यांना अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या किशोर पिंपळकर यांना रॉडने मारहाण करण्यात आली. किशोर पिंपळकर गंभीर जखमी झाल्यामुळे चंद्रपूरातील एका दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी त्यांना नागपूर येथे हलविण्यास सांगितले. उपचारादरम्यान नागपूर येथे खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्या मृत्यू झाला.
मृतक किशोर पिंपळकर हे भद्रावती तालुक्यातील तिरवंजा गावातील रहिवासी होते. त्यांचे खून केल्याप्रकरणी बाबूपेठ येथील पाच युवकांवर 302, 307, 324, 646, 142, 447, 148 कलमान्वये गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे