

बुलढाणा : खामगाव-जालना ह्या १६२ कि.मी.अंतराच्या विशेष रेल्वे मार्ग प्रकल्पाचा 'प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन'मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निर्णयाबद्दल केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मंगळवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.
या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या पुढील प्रक्रियेला अधिक गती मिळावी, यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे विभागातील उच्चस्तरीय अधिकारी आणि बुलढाणा जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करावी अशी मागणीही जाधव यांनी केली. त्याला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनची सुरुवात १३ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आली. देशातील विविध पायाभूत सुविधा आणि बहुविध वाहतूक साधनांना एकात्मिक पद्धतीने चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या मास्टर प्लॅनमध्ये आता खामगाव-जालना रेल्वे मार्गाचा समावेश झाल्यामुळे प्रकल्पाच्या कामाला अपेक्षित गती मिळणार आहे.
विदर्भ-मराठवाड्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा
खामगाव-जालना रेल्वे मार्ग हा विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. तसेच मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे मार्गांना जोडण्याच्या दृष्टीनेही या रेल्वे मार्गाचे महत्त्व आहे.तसेच सध्याच्या रेल्वे मार्गांमधील अंतर कमी होणार असून या भागातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.
जिल्ह्यात राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ असलेले सिंदखेड राजा, जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर आणि शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांचे समाधीस्थळ अशी महत्त्वाची पर्यटनस्थळे आहेत. नव्या रेल्वे मार्गामुळे या पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या वाहतूक सुविधांना चालना मिळण्यासोबतच व्यापार, पर्यटन, कृषी उत्पादनांची वाहतूक आणि औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.
अकोला-खंडवा रेल्वे मार्गांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यांतून नवीन रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. मात्र हे काम संथ गतीने सुरू असल्याने त्यालाही आवश्यक गती देण्यात यावी, अशी मागणी प्रतापराव जाधव यांनी केली. खामगाव-जालना रेल्वे मार्ग हा विकासाचा प्रकल्प आहे त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांच्या दीर्घकाळाच्या अपेक्षेशी आणि लोकभावनेशी जोडलेला विषय आहे. त्यामुळे या प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने व्हावी अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मांडली.