

Farmer brutally murdered over dispute regarding compensation for a goat
देऊळगाव राजा, पुढारी वृत्तसेवा : शेतात लावलेल्या विद्युत प्रवाहाच्या सापळ्यामुळेच बकरी मेली आहे. या संशयातून भरपाईपोटी पैसे न देणाऱ्या शेतकऱ्याची रागाच्याभरात काठीने बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. ही घटना तालुक्यातील पाडळी शिंदे येथे बुधवार, दि. ५ रोजी उघडकीस आली. या प्रकरणी दोन संशयित आरोपींना अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद केले आहे. मच्छिंद्र तुकाराम मोरे वय ५५ असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
दरम्यान, बुधवार, दि. ५ रोजी सकाळी पाडळी शिंदे येथील पोलिस पाटील भारत शिंदे यांनी मच्छिंद्र मोरे हे घरासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती अंढेरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रूपेश शक्करगे यांना मिळाल्यानंतर त्यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन ठोसरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथक व श्वान पथक घटनास्थळी बोलावले. श्वान पथकातील 'राणी' या श्वानाने घटनास्थळी मिळालेल्या रुमालाच्या आधारे संशयिताचा माग काढला. त्यानुसार पोलिसांनी मच्छिंद्र माणिकराव सरोदे याच्यासह दोन संशयितांना अवघ्या दोन तासांत ताब्यात घेतले.
या प्रकरणी प्रियंका राहुल खरात (रा. पीरकल्याण, जि. जालना) यांच्या फिर्यादीवरून मच्छिंद्र माणिकराव सरोवे व एका अनोळखी साथीदाराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. घटनास्थळी पोलिस अधिकारी जारवाल, नितीन पिसे, किशोर जाधव सोनकांबळे, पोलिस पाटील भारत शिंदे सरपंच राजू ठेंग आदी उपस्थित होते.
राणीने काढला आरोपीचा माग
श्वान पथकातील 'राणी' या श्वानाने घटनास्थळी मिळालेल्या रुमालाच्या आधारे संशयिताचा माग काढला. त्यानुसार अंढेरा पोलिसांनी मच्छिंद्र माणिकराव सरोदे याच्यासह दोन संशयितांना अवघ्या दोन तासांत ताब्यात घेतले.