

बुलडाणा : छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने नव्हे, तर वतनदारी बंद केली म्हणून त्यांच्या सासऱ्यांनीच मारले, असे वादग्रस्त विधान प्रहार पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी केल्यामुळे त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका होऊ लागली आहे. पातुर्डा येथे राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेत सोमवारी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करता आमदारांनाच कापून टाका, असा सल्ला दिला.
पूर्वी वतनदारी चालत होती. त्यातून निजामशाही, आदिलशाही चालत होती. ही वतनदारी बंद केल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज सासऱ्यांकडून मारले गेले. मात्र नाव औरंगजेबाचे घेतले गेले. राजा असा हवा. तो मरण पत्करायला तयार झाला. पण त्यांनी सासऱ्याला वतन दिले नाही, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांना आज कमी भावात सोयाबीन विकावे लागत आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतो. तथापि, शेतकरी आंदोलनाकडे पाठ फिरवतात. शेतकरी अन्याय सहन करण्यासाठी तयार असतील तर त्यांनी तसे जाहीर करून टाकावे, अशीही व्यथा त्यांनी बोलून दाखवली.
आंदोलनाबद्दल ते म्हणाले, मी आजवर 350 हून अधिक आंदोलने केली आहेत. किमान चार कलेक्टर आडवे केले. तीन सचिवांना मंत्रालयात फोडले. काय फरक पडला? शेतकऱ्यांमधील हिंमत गेली कुठे? तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना लाज वाटली पाहिजे.
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावर वाद निर्माण झाल्यानंतर बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, वतनदारी शेतकऱ्यांच्या हिताची नव्हती. ती लुटीचे तंत्र होते. आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी वतनदारी बंद केली. सासऱ्यांनी वतनादारी मागितली तरी संभाजीराजेंनी ती दिली नाही. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या हालचालीची खबर औरंगजेबाला देण्याचे काम सासरच्या मंडळींनी केले, हा इतिहास आहे. तो जाणून घेतला पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.