

बुलडाणा : जिल्हयातील संग्रामपूर व जळगांव जामोद या दोन्ही तालुक्यात सोमवार १ जून च्या सायंकाळी अवकाळी वादळी पावसामुळे केळी व संत्रा बागांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळवा-याच्या तडाख्याने अनेक घरावरची टिनपत्रेही उडून गेली आहेत.परिसरातील केळी व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून दिलासा देण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
या पावसामुळे संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा, सावळा, अकोली, चांगेफळ, निवाना, रुधाना, वकाना, पळशी झाशी, बावनबीर, टुनकी, काकनवाडा, वरवंड आदी गावांच्या सहाशे हेक्टर शेतशिवारातील केळी बागांना या अवकाळी पावसाचा फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे. जळगांव जामोद तालुक्यातही सुमारे ४५० हेक्टर शेतजमीनीवरील केळी बागांचे नुकसान झाले आहे.
काही ठिकाणी संत्रा बागांचेही या वादळी पावसामुळे नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी घरावरची व गोठयावरची टिनपत्रे उडून गेल्यामुळे शेतमालाचे नुकसान झाले. यासंदर्भातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.