

बुलढाणा: आम्ही शेतक-यांचीच मुले आहोत.त्यामुळे अवर्षणाने त्यांना झालेले दु:ख व नुकसान आम्ही समजू शकतो.संकटाच्या काळात बळीराजाने खचून जाऊ नये,शासन खंबीरपणे त्यांच्या पाठिशी उभे आहे. अशा शब्दात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अवर्षणामुळे खचलेल्या शेतक-यांना दिलासा दिला.
आज रविवारी खामगांव तालुक्यातील पिंप्राळा येथे शेताच्या बांधावर पोहोचून शेतक-यांच्या भेटी घेतल्या. एल निनोच्या प्रभावाने पावसात पडलेल्या खंडामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अशावेळी नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी तातडीने व अचूक पंचनामे पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल.अशी ग्वाही कृषिमंत्री भरणे यांनी शेतक-यांना दिली.
पावसातील खंड, अनियमित पर्जन्यमान आणि त्याचा पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत कृषिमंत्री भरणे यांनी पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
नुकसानग्रस्त भागातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याचा पंचनामा अचूकपणे होईल, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देशही मंत्री भरणे यांनी दिले. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आणि थेट मदत पोहोचविण्यासाठी शासन खंबीरपणे कार्यरत आहे,असेही मंत्री भरणे यांनी सांगितले.
पाणी, चारा आणि वीजपुरवठ्याला प्राधान्य
पीक नुकसानीसोबतच पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा आणि वीजपुरवठा या मूलभूत बाबींवर प्रशासनाने प्राधान्याने कार्यवाही करावी, अशा सूचना भरणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. या पाहणीचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येईल. त्यानंतर शेतकऱ्यांना आवश्यक मदत व दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर योग्य निर्णय घेण्यात येईल,असे कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले
या पाहणी दौऱ्यात त्याच्यासमवेत कामगार मंत्री आकाश फुंडकर, कृषी आयुक्त सुरज मांडरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डांबरे , उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी आदी उपस्थित होते.