भंडारा: जिल्ह्यातील धान उत्पादकांचे चुकारे तीन महिन्यांपासून प्रलंबित आहेत. सरकार आणि अधिकाऱ्यांकडून चुकारे देण्यासंदर्भात टोलवाटोलवीचे उत्तरे दिली जातात. मागणीनुसार खते मिळत नाही. शेतकऱ्यांना २५ हजार हेक्टरी मदत देऊन त्यांची बोळवण केली जाते. असे असतानाही सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे हे सरकार शेतकरीविरोधी आहे, असा घणाघात मावळते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पद सोडल्यानंतर ते पहिल्यांदाच भंडारा येथे पत्रकारांशी बोलत होते.
पटोले म्हणाले, सरकारने धानाच्या पोत्यांमध्ये भ्रष्टाचार केला आहे. चांगल्या प्रतीचे पोते देण्याचे अपेक्षित असताना अत्यंत जीर्ण पोते देण्यात आले. सुतळीतही कोट्यवधींचा भ्रष्टाचार करण्यात आला. धान ठेवण्यासाठी प्लास्टीक पायलेटचा पुरवठा करण्यासाठी अनुभव नसलेल्या कंपनीला कंत्राट देण्यात आले. अशुद्ध पाण्यामुळे होणाऱ्या जीबीएस या आजाराने मुंबई, पुणे आणि नागपूरात थैमान घातले. भंडारा जिल्ह्यातही नाग आणि कन्हान नदीच्या दूषित पाण्यामुळे या आजारातून अनेकांचा बळी गेल्याची शक्यता आहे. परंतु, त्याची शहानिशा न केल्याने आणखी अनेकांचा बळी जाण्याची भीती आहे. दूषित पाण्याचा सर्वाधिक फटका भंडारा, पवनी आणि मोहाडी तालुक्याला बसत असल्याचे पटोले यांनी नमूद केले.
सन २००९ मध्ये राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल पटेल यांनी भंडारानजिकच्या भिलेवाडा येथे व्हिडीओकॉन प्रकल्प आणला. या प्रकल्पातून हजारो तरुणांना रोजगार मिळणार असल्याचे स्वप्न पटेल यांनी तरुणांना दाखविले होते. या प्रकल्पाच्या भरवशावर त्यांनी निवडणूक जिंकली. पण प्रकल्प मात्र सुरू झाला नाही. आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी त्याच प्रकल्पाच्या जागेवर पुन्हा नवीन प्रकल्प सुरू केला. त्यातून किती लोकांना रोजगार मिळाला? असा प्रश्न उपस्थित करत भंडारा जिल्ह्यातील मतदारांना फसविण्याचे काम प्रफुल पटेल यांनी केल्याचा आरोप आ. नाना पटोले यांनी केला.