

Bhandara Monsoon Rain
भंडारा : बळीराजाची प्रतीक्षा संपवत पावसाने संपूर्ण जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या सरी कोसळताच शेतीकामांना एकच वेग आला आहे. धानाच्या रोवणीच्या कामांना गती मिळाली आहे. शेतातील चिखलणी आणि रोवणीच्या धावपळीमुळे ग्रामीण भागात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असले तरी, वाढत्या मजुरीच्या दराने आणि मजुरांच्या टंचाईने शेतकºयांच्या चिंतेत भर घातली आहे.
सध्या रोवणीचा काळ सुरू झाला असून, शेतकरी पहाटेपासूनच शेतात दाखल होत आहेत. मात्र, या कामांसाठी लागणाºया मजुरांची संख्या कमी पडत असल्याने शेतकºयांची मोठी लगबग उडाली आहे. धानाची रोवणी ही प्रामुख्याने मानवी श्रमावर आधारित काम आहे. एकाच वेळी संपूर्ण भागात रोवणीची कामे सुरू झाल्याने मजुरांची मागणी प्रचंड वाढली आहे. मजुरांची उपलब्धता कमी असल्याने वेळेवर कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान शेतकºयांसमोर उभे राहिले आहे.
धापेवाडा बॅरेजला पाण्याची आवक वाढत असल्यामुळे पाण्याचा विसर्ग १०४४ क्युमेक्स वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे वैनगंगेच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. भंडारा येथील वैनगंगेची धोक्याची पातळी २४५.५० मीटर असून सध्याची पातळी २४३.६२ मीटरवर आहे.
दोन दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील काही ग्रामीण मार्ग प्रभावित झाले आहेत. खमारी गावाला जोडणारा पूल लहान असल्याने या पुलावर पाणी चढल्याने या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे.