

भंडारा : सततची नापिकी आणि त्यातून आलेल्या कर्जबाजारीपणाच्या सावटाखाली असलेल्या एका ३७ वर्षीय तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आपले जीवन संपवल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील बोथली येथे २६ जुलैच्या सायंकाळी घडली. उमेश सिताराम बगमारे (वय ३७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
उमेश बगमारे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. काही वर्षांपासून निसर्गाची साथ न मिळाल्याने शेतात सतत नापिकी होत होती. त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर साचला होता. कर्जाची परतफेड कशी करावी, या चिंतेत ते मागील काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते.
रविवारी (दि. २६) सकाळी उमेश यांची आई व पत्नी रोवणीच्या कामासाठी शेतात गेल्या होत्या. घरात कुणीही नसल्याची संधी साधून, राहत्या घरातील आतील खोलीत पंख्याला दुपट्याने गळफास लावून त्यांनी आपले जीवन संपवले.
घटनेची माहिती तातडीने दिघोरी पोलिसांना देण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे. नापिकी व कर्जाच्या तणावातूनच उमेश यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.